कुठेतरी बाहेर लफडं..; घटस्फोटाविषयी राहुल देशपांडे नेमकं काय म्हणाले?
गायक राहुल देशपांडे यांनी गेल्या वर्षी पत्नी नेहापासून विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. घटस्फोटाच्या या पोस्टनंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. लग्नाच्या 17 वर्षांनंतर त्यांनी पत्नी नेहाला घटस्फोट दिला. याविषयीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली होती. या पोस्टनंतर त्यांना अनेकांचे फोन आले होते, मात्र त्यांनी एकही फोन घेतला नसल्याचं सांगितलं. “हा माझा वैयक्तिक विषय आहे, मला कोणाशीच बोलायचं नव्हतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर ट्रोलिंग कशाप्रकारची झाली आणि त्याला ते कसं सामोरं गेले, याविषयीही ते व्यक्त झाले.
काय म्हणाले राहुल देशपांडे?
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट मुलाखतीत राहुल देशपांडे म्हणाले, “एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक होती, असं म्हणतो. पण आमच्यात असं काहीच झालं नाही. हे काही मुद्दामून होत नाही. त्याला विविध कारणं असतात. यात तुमची चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याची चूक असते, त्यामुळे प्रत्येकाच्या दोन बाजू असतात. मला असं वाटतं की विनाकारण आपण त्याचा खूप मोठा बाऊ करतो. मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. घटस्फोटाची पोस्ट अपलोड केल्यानंतर मी एकही फोन घेतला नाही. मला कोणाशीच बोलायचं नव्हतं. हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी कसा बरोबर होतो आणि माझ्यावर कसा अन्याय झाला, हे मी का सांगायचं? कारण हे झालेलंच नाही. मग हे सगळं समजावून सांगण्यासाठी एवढा वेळ का खर्च करायचा?”
View this post on Instagram
“या सर्व गोष्टींचा नेहा आणि रेणुकाला खूप त्रास झाला. ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी ते कोणच्याही आयुष्यात होऊ शकतं. यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत. किंवा कोणाची चूक आहे, हा असाच आहे, याला काही अक्कल नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल.. या असल्या गोष्टींना काही अंतच नाही”, असं ते पुढे म्हणाले.
सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करण्याविषयी त्यांनी सांगितलं, “मी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला सोशल मीडियावर नेहा, रेणुकासोबत माझ्या बऱ्याच पोस्ट दिसतील. त्यामुळे मला असं वाटलं की ही माझी एक जबाबदारी आहे की, जे मला लोक, चाहते मला फॉलो करतात, त्यांना हा अध्याय संपला आहे, याची माहिती देणं. त्यामागे हाच हेतू होता. घटस्फोटानंतर नेहासोबत माझे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आईवडील आहोत आणि ते कायम राहू.”
