घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियावर का? राहुल देशपांडे स्पष्टच म्हणाले “हा अध्याय संपला..”
गायक राहुल देशपांडे हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. आयुष्यातील हा अध्याय संपल्याचं त्यांनी सोशल मीडियावर का जाहीर केलं, यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी लग्नाच्या 17 वर्षांनंतर पत्नी नेहापासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. राहुल आणि नेहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. घटस्फोटाचं वृत्त सार्वजनिक करण्याआधी दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना त्याविषयी सांगितलं होतं. त्यानंतरच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं. घटस्फोटासारखी अत्यंत वैयक्तिक गोष्ट सोशल मीडियावर का जाहीर केली, त्यामागचा हेतू काय होता, हे राहुल देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले राहुल देशपांडे?
‘मित्र म्हणे’ या पॉस्टकास्टला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाले, “मी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला सोशल मीडियावर नेहा, रेणुकासोबत माझ्या बऱ्याच पोस्ट दिसतील. त्यामुळे मला असं वाटलं की ही माझी एक जबाबदारी आहे की, जे मला लोक, चाहते मला फॉलो करतात, त्यांना हा अध्याय संपला आहे, याची माहिती देणं. त्यामागे हाच हेतू होता. कारण कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो तर आम्ही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करायचो. खूप असे नाही, पण काही गोष्टी सार्वजनिक होत्या. त्या अजूनही माझ्या इन्स्टाग्रामवर आहेत. त्यामुळे हा अध्याय संपला आहे, हेसुद्धा लोकांना सांगायला पाहिजे, असं मला वाटलं. बाकी काही नाही. घटस्फोटानंतर नेहासोबत माझे संबंध खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आईवडील आहोत आणि ते कायम राहू.”
राहुल देशपांडे यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘माझं आणि नेहाचं 17 वर्षांचं वैवाहिक नातं आता संपुष्टात आलं आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये आम्ही कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. हा निर्णय आम्ही दोघांनी खूप विचार करून, समजून आणि सोहार्दपूर्ण पद्धतीने घेतला आहे. हा बदल समजून घेण्यासाठी आणि योग्य पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला.’
राहुल देशपांडे हे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि अभिनेते आहेत. ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. महान गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचे ते नातू आहेत. राहुल शास्त्रीय संगीत, ठुमरी, गजल आणि भजनसाठी ओळखले जातात. ते ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आणि ‘संगीत सम्राट 2’ यांसारख्या टीव्ही शोजमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होते.
