AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे..”; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध गायकाला कायदेशीर नोटीस

प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी एका पॉडकास्टमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याविरोधात आता त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे..; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध गायकाला कायदेशीर नोटीस
Abhijeet Bhattacharya Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 05, 2025 | 12:59 PM
Share

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील वकील असिम सरोदे यांनी त्यांचे क्लाएंट मनिष देशपांडे यांच्या वतीने अभिजीत भट्टाचार्य यांना नोटीस पाठवली आहे. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अभिजीत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी खटला करण्यात येणार असल्याचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत भट्टाचार्य यांनी महात्मा गांधींना भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षाही मोठे होते, असं ते म्हणाले. आरडी बर्मन हे संगीत विश्वातील भारताचे राष्ट्रपिता होते, तर महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांनी केलं होतं.

“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत हा पूर्वीपासूनच अस्तित्वात होता, नंतर भारतापासून पाकिस्तान वेगळं झालं. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटलं गेलंय. पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी तेच जबाबदार होते”, असं मत अभिजीत यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांचं हे मत सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि अनादर करणारं असल्याचं म्हणत काहींनी निषेध व्यक्त केला.

अभिजीत यांनी त्यांच्या या वक्तव्यासाठी लेखी माफीनामा सादर नाही केला तर त्यांच्यावर फौजदारी खटला सुरू करण्याचा इशारा असिम सरोदेंनी केला. ‘महात्मा गांधींमुळे राष्ट्र म्हणून भारताची जागतिक स्तरावर ओळख आहे. तुमच्या या वक्तव्यामुळे महात्मा गांधींच्या प्रतिष्ठेला कलंक लागला असून त्यांची बदनामी झाली आहे’, असं सरोदे यांनी नोटिशीत म्हटलंय.

“भारत आधीपासूनच अस्तित्वात होतं आणि पाकिस्तानची निर्मिती चुकून झाली, असा दावा करत तुम्ही मूर्खपणाचं वक्तव्य केलंय. या वक्तव्यातून तुमच्या मनात महात्मा गांधींबद्दल द्वेष असल्याचं दर्शवतंय. या वक्तव्यासाठी तुम्ही औपचारिक माफी मागितली नाही तर तुमच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेतील कलम 353, 506 अंतर्गत तक्रार दाखल केली जाईल”, अशी नोटीस अभिजीत यांना पाठवण्यात आली आहे. या नोटिशीवर अद्याप अभिजीत यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.