नदीत उडी मारून स्वत:ला संपवलं… बड्या निर्मात्याच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्री हादरली; हिरो हिरोईनच्या मनात एकच प्रश्न…
K Rajan : प्रसिद्ध निर्माते के राजन यांनी रविवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध निर्माते के राजन यांनी रविवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार के राजन यांनी चेन्नईतील अडयार ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
के राजन कोण होते?
के राजन तमिळ सिनेसृष्टीत निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी 1983 मध्ये ब्रह्माचारिगल या चित्रपटातून निर्माता म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी डबल्स, अवल पावम आणि निनाइकोआथा नालिआई यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. 1991 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट नम्मा ओरू मारिअम्मा होता. या चित्रपटात निजालघल रवी आणि सरतकुमार प्रमुख भूमिकेत होते. नंतर त्यांनी उनार्चिगलसारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.
लेखक आणि अभिनेता म्हणूनही ओळख
के. राजन यांनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या होत्या. त्यात थंगमाना थंगाची आणि उनार्चिगल या चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेता म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. मायकल राज, सोनथाकरण, वीट्टोडा मापिलाई, पांबू सातई, थुनिवू आणि बकासुरन या चित्रपटांमध्ये राजन यांनी अभिनय केला होता.
स्पष्टवक्तेपणासाठी होते प्रसिद्ध
के राजन हे त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक वक्तव्यांसाठी विशेष चर्चेत असायचे. चित्रपटसृष्टीतील मोठ्या स्टार्सवर खुलेआम टीका करण्यासाठी त्यांची ओळख होती. अनेक जण करिअरच्या भीतीने थेट बोलणे टाळतात, मात्र राजन कोणाचेही नाव घेण्यास मागेपुढे पाहत नसत.
धनुष आणि कार्तीवर केली होती टीका
के राजन अनेकदा मोठ्या बजेटच्या चित्रपटांवर टीका करत असत. अशा चित्रपटांमुळे निर्मात्यांवर कर्जाचा बोजा वाढतो, असे त्यांचे मत होते. त्यांनी कार्तीच्या आयरथिल ओरुवन आणि धनुषच्या एनाई नोकी पाययुम थोटा या चित्रपटांचा उल्लेख करत हे चित्रपट गरजेपेक्षा जास्त खर्चिक ठरल्याचा आरोप केला होता.
नयनताराच्या मानधनावरही प्रश्न
नयनतारायांच्या कोट्यवधींच्या मानधनावरही के राजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. मोठे स्टार्स मोठे मानधन घेतात, पण चित्रपटाच्या प्रमोशनला उपस्थित राहत नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती. निर्मात्यांनी एवढा पैसा खर्च केल्यानंतर कलाकारांनीही प्रमोशनमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणत असत.
योगी बाबूवरही होते नाराज
कॉमेडियन योगी बाबू यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. परमपदम विलायत्तु’च्या प्रमोशनल कार्यक्रमात माध्यमांपासून दूर राहणाऱ्या कलाकारांवर त्यांनी निशाणा साधला होता. निर्मात्यांचे पैसे घेऊन प्रमोशनपासून दूर राहणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.
वाढत्या खर्चांवरही व्यक्त केली होती नाराजी
के राजन फक्त कलाकारांच्या मानधनावरच नव्हे, तर चित्रपटांच्या सेटवर होणाऱ्या अनावश्यक खर्चांवरही टीका करत असत. विशेषतः मोठ्या कलाकारांसोबत असणाऱ्या पर्सनल टीम्स आणि त्यांच्या खर्चांवर ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. आता राजन यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी असं का केलं हा प्रश्न अनेक कलाकरांच्या मनाला भेडसावत आहे.
