काळाकुट्ट धूर, स्फोटांचे आवाज; हॉटेलमध्ये कैद असताना अचानक घोषणा झाली अन्… दुबईत अडकलेल्या भारतीयांसोबत मध्यरात्री काय घडलं?
दुबई विमानतळावर झालेल्या भीषण स्फोटांनंतर अडकलेले भारतीय प्रवासी अखेर सुखरूप मुंबईत परतले आहेत. युद्धाचा थरार आणि जीवघेण्या प्रवासाची संपूर्ण माहिती वाचा या बातमीत.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे सध्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियातील सर्वच विमानतळावर अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक हे परदेशात अडकले आहेत. भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच काल भारत सरकार आणि एमिरेट्स (Emirates) विमान कंपनीच्या समन्वयाने एका विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत भारत सरकारचे आभार मानले आहेत. यानंतर एका प्रवाशाने दुबईत नेमकी कशी परिस्थिती होती याबद्दलची माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
इराण आणि इस्रायलमधील युद्धाने रौद्र रूप धारण केल्यामुळे मध्यपूर्वेतील आकाश सध्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या आवाजाने हादरले आहे. याच युद्धाचा थेट फटका दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला. दोन दिवसांपूर्वी दुबई विमानतळाच्या परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे मोठी भीती पसरली होती. दुबई विमानतळावर धुराचे साम्राज्य होते. सर्वत्र काळा धूर पसरला होता. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली. यामध्ये भारताच्या विविध शहरांत जाणारे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते.
स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई
मर्चंट नेव्हीमध्ये रुजू होण्यासाठी निघालेल्या अजय सिंग यांच्यासाठी हा प्रवास एका दुख:द स्वप्नासारखा ठरला. मी दुबई विमानतळावर कनेक्टिंग फ्लाईटची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण विमानतळ धुराने भरून गेले. यानंतर विमानतळावर घबराट पसरली. काही लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. आम्हाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिथे इतके कडक निर्बंध होते की आम्हाला हॉटेलच्या खोलीबाहेर पडण्यास, अगदी स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई होती, असे अजय सिंग यांनी सांगितले.
अनेकांकडून जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त
आम्ही रात्रभर ज्या हॉटेलमध्ये होतो, तिथे फक्त स्फोटांचे आणि विमानांचे आवाज येत होते. आम्ही घरी परतण्याची आशा सोडली होती. हॉटेलमध्ये अनेक थकलेले प्रवासी जेव्हा इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच अचानक घोषणा झाली की, भारतीयांसाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एमिरेट्स विमान कंपनीने पुढाकार घेत या प्रवाशांसाठी तातडीने उड्डाण आयोजित केले, असेही त्यांनी म्हटले.
ही घोषणा होताच प्रत्येक भारतीय व्यक्तींनी एकही क्षण वाया न घालवता आपले सामान गोळा केले आणि विमानतळाकडे धाव घेतली. आज पहाटे ३ वाजता जेव्हा हे विशेष विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा प्रत्येक प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विमानातून बाहेर पडताच अनेकांनी जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. मी तिथे जे पाहिले ते भयानक होते, पण आता आपल्या देशाच्या मातीवर पाऊल ठेवताच सर्व भीती नाहीशी झाली आहे. आता आम्ही सुरक्षित आहोत, अशी भावना अजय सिंग यांनी व्यक्त केली.
