विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना विठ्ठलाला अडचणीत न आणण्याबाबत खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व मिळावे अशी साकडे विठ्ठलाला घालणार असल्याच्या भरणेंच्या विधानावर पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. विठ्ठलाला राजकारणात ओढू नका, असे सांगत त्यांनी अन्य राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले.

विठ्ठलाला साकडं घालून, जर गोष्टी होत असत्या, तर या आधी पण खूप झाल्या असत्या. विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका, असा खोचक टोला भाजपाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळो, असं साकडं विठ्ठलाला घालणार असल्याचं कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलं होतं. त्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हा टोला लगावला आहे. सांगलीच्या मिरजेत शासकीय रुग्णालयातील विविध लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पाटील बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांचं लक्ष कृषी मंत्र्यांच्या विधानाकडे वेधण्यात आलं. तेव्हा त्यांनी भरणे यांना हा टोला लगावला. विठ्ठलाला असं अडचणीत आणू नका, असा चिमटा चंद्रकांतदादांनी भरणे यांना काढला. यावेळी त्यांनी रामरक्षेच्या मुद्द्यावरूनही ठाकरे गटाची चांगलीच कान उघाडणी केली. राम रक्षा म्हणायला त्यांना रोज कारण लागतं. पण आम्ही रोजच म्हणतो, असा टोलाच चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
यात मोदींचा काय संबंध?
राम मंदिरातील दानपेटीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे. पण त्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोठे संबंध आला? आणि राम रक्षा कोठे आली? असा सवाल देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे. नागपूर येथे शिवसेनेकडून राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी व्हावं, असं निमंत्रण संजय राऊतांनी दिले आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी हा टोला लगावला आहे.
आमच्यासमोर कोणताच प्रस्ताव नाही
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा जयंत पाटील एनडीएत समावेश होण्याबाबतचा कोणता प्रस्ताव आला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री पहाटे 3 पर्यंत लोकांना भेटतात. त्यामुळे रात्री का गेले? रात्रीच्या अंधारात गेले का? या प्रश्नाला अर्थ नाही. काहीतरी सामायिक काम असतील, असे विधान त्यांनी केले आहे.पक्षात कोणाला घ्यायचं की नाही याबाबत कोअर कमिटी निर्णय घेते. बैठकीनंतर बेरीज-वजाबाकीचा विचार करून निर्णय होतो. पण अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.
विस्ताराचा प्रस्ताव नाही
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप झालेला नाही, असेही त्यांनी सांगितलं. प्रत्येक राज्यात आणि देशात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने चालू असतात. मात्र मंत्रिमंडळ पुनर्गठण ठराविक 2-4 जण बसतात. त्या-त्या मंत्र्यांची गुणपत्रिका पाहिली जाते. त्यावरून तो निर्णय घेतला जातो. नवीन काही घ्यायचे का नाही याचा देखील प्रस्ताव होतो आणि तो दिल्लीला पाठवला जातो. पण अशा कोणत्याही प्रकारचा प्रस्तावाची सुरुवात झाली नाही, असे त्यांनी सांगितलं.
