Nepal Flood Alert: नेपाळमध्ये पुन्हा महापुराची धास्ती; नदीचा आवाज वाढताच नागरिकांना अलर्ट
Nepal Flood: नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. त्यामुळे नव्या पुराच्या इशाऱ्यामुळे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Nepal Flood: नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसतानाच पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. भोटे कोशी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः नदीकाठच्या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भोटे कोशी नदीच्या वाढत्या प्रवाहाचा धोका लक्षात घेता रसुवा, नुवाकोट आणि धादिंग या जिल्ह्यांतील नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
स्थानिक प्रशासनाला नदीच्या प्रवाहाचा आवाज वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला. परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात असून, नव्या घडामोडींची माहिती नागरिकांना तातडीने दिली जाणार आहे. नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने (NDRRMA) नदीच्या आसपासच्या भागातील नागरिक तसंच मदत आणि बचाव पथकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आधीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागरिकांना अलर्ट
जिल्ला प्रशासन कार्यालय, रसुवाबाट भोटेकोशी नदीमा बाढीको बहाव बढेको आवाज सुनिएको भन्ने सूचना प्राप्त भएकोले रसुवा, नुवाकोट, धादिंङसम्म नदी आसपासको क्षेत्रमा सतर्कता अपनाउनु हुन अनुरोध गर्दछौं। थप जानकारी प्राप्त हुनासाथ थप अपडेट गर्दै जाने छौै।
— NDRRMA (@NDRRMA_Nepal) August 29, 2026
नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचा आवाज
26 ऑगस्ट रोजी भोटे कोशी आणि त्रिशूली नदीच्या खोऱ्यात आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या घटनेनंतर नदीच्या प्रवाहात पुन्हा वाढ होणं हे बचाव आणि मदतकार्यांसाठीही मोठं आव्हान ठरू शकतं. ‘भोटे कोशी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती रसुवा इथल्या जिल्हा प्रशासकीय कार्यालयाला मिळाली आहे. त्यामुळे रसुवा, नुवाकोट आणि धादिंगपर्यंतच्या नदीकिनारी असलेल्या परिसरात सावधगिरी बाळगण्याची विनंती आम्ही करतो. अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट दिले जाईल’, असं नेपाळच्या एनडीआरआरएमएनं (NDRRMA) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय.
परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 88 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर 120 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये यशस्वी प्रवेश केला आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या महापुरानंतर एकूण 2418 व्यक्ती बेपत्ता आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तर पूरग्रस्त भागांमध्ये 287 भारतीय नागरिक आणि 128 भारतीय वंशाचे व्यक्ती (PIOs) अद्याप बेपत्ता आहेत.
