Landslide: नेपाळनंतर या देशात हाहाकार! लँडस्लाइडमध्ये १६ जणांचा मृत्यू, ५४६ जण बेपत्ता
China Landslide: नेपाळनंतर चीननेही निसर्गाचा प्रकोप अनुभवला आहे. ग्यिरोंग बंदराजवळील भूस्खलनात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ५४६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत ४९ भारतीय नागरिकही बेपत्ता आहेत.

चीन-नेपाळ सीमेवरील ग्यिरोंग पोर्टवर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलनानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यानंतर दक्षिण-पश्चिम चीनच्या शिजांग स्वायत्त प्रदेशाच्या सरकारच्या मते, शनिवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत १६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर ५४६ जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ४९ भारतीयही समाविष्ट आहेत. सध्या मदत आणि बचाव दल सातत्याने बेपत्ता लोकांच्या शोधात गुंतले आहेत. एकीकडे नेपाळमध्ये मृत्यूचा हाहाकार उडाला असताना आता नेपाळच्या बाजुचा देश असलेल्या चीनमध्ये देखील मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या शिजांग परिसरातील सीमाभागात एक बंदर परिसरात भूस्खलन झाले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, भूस्खलनानंतर २३ देशांच्या एकूण २६१ परदेशी नागरिकांबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. यामध्ये सर्वाधिक १०४ नागरिक नेपाळचे आहेत. ४९ भारतीयांसह लॅटव्हियाचे ३३, अमेरिकेचे १८ आणि ब्रिटनचे १५ नागरिक यांचा समावेश आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे ६-६ नागरिकही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे ४, मलेशियाचे ३, जर्मनीचे ३ आणि स्पेनचे ३ नागरिकांचाही पत्ता लागलेला नाही. आयर्लंड आणि एस्टोनियाचे २-२, तर फ्रान्स, नेदरलँड्स, न्यूझीलंडसह अनेक इतर देशांचे नागरिकही बेपत्ता लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत.
२३ देशांचे नागरिक लँडस्लाइडमध्ये अडकले
ही माहिती शिजांग प्रदेशाच्या सरकारच्या माहिती कार्यालयाकडून आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परराष्ट्र व्यवहार, सार्वजनिक सुरक्षा, संस्कृती आणि पर्यटन तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागांनी एकत्रितपणे अनेक स्तरांवर तपास आणि माहितीचा एकत्रित केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी संबंधित देशांच्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनाही या परिस्थितीची माहिती दिली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, बंदर आणि आजूबाजूच्या भागात अनेक वेळा शोधमोहीम राबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या ग्यिरोंग काउंटीमध्ये कोणताही परदेशी पर्यटक अडकलेला नाही. मात्र, मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याने शोध आणि बचाव अभियान अद्याप सुरू आहे. प्रशासन प्रभावित भागात मदतकार्य तीव्र करण्यासोबतच बेपत्ता लोकांची माहिती जमा करण्यात गुंतले आहे.
नेपाळमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा ६७० च्या वर
यापूर्वी, नेपाळ-चीन सीमेवर हिमनदीमुळे आलेल्या विनाशकारी पुरामुळे सर्व काही पाण्याखाली गेले होते. तिबेटमध्ये हिमनदी फुटल्यानंतर भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे गावे पत्त्यांच्या घराप्रमाणे वाहून गेली. सध्या, या आपत्तीत ६७६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास २,००० लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
