अवघ्या 30 मिनिटात तुरुंगातून बाहेर… इमरान खानबाबत मोठा प्लान; पाकिस्तानात मोठं काही घडणार?
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबादमध्ये मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता बळावलेली असतानाच पाकिस्तान सरकारची आणखी एक डोकेदुखी वाढणार आहे. पाकिस्तानात आता मोठं काही घडेल असं दिसत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल अफरीदी यांनी पेशावरमध्ये पार्टी सभेला संबोधित करताना ही घोषणा केली आहे. इमरान खान यांना न्याय मिळाला नाही तर 27 सप्टेंबर रोजी आम्ही इस्लामाबादच्या रस्त्यावर उतरू, असा इशारा देतानाच आम्ही 30 मिनिटाच्या आत इमरान खान यांना तुरुंगातून बाहेर काढू शकतो, असं विधानही सोहैल अफरीदींनी केलं आहे.
सोहैल अफरीदी यांनी पीटीआयच्या काही मागण्या मांडल्या. सर्वात आधी इमरान खान आणि त्यांच्या पत्नीविरोधात चाललेली सुनावणी निश्चित करा. न्यायालयाने मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे, इमरान खान यांना त्यांची कायदेशीर टीम, डॉक्टर, नातेवाईक आणि पार्टी नेत्यांना भेटण्याची पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी सोहैल यांनी केलीय.
तर रस्त्यावर उतरू
जर इमरान खान यांना न्याय मिळाला तर ते 300 मिनिटात तुरुंगाच्या बाहेर येतील. तसं नाही झालं तर आम्ही देशभरातील पीटीआयचे कार्यकर्ते इस्लामाबादच्या रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याआधी सोहैल यांनी इमरान खान यांना भेटता यावं आणि इमरान यांची सुटका व्हावी म्हणून आधीच इशारा दिलेला आहे. मे महिन्यात त्यांनी इमरान खान यांना भेटू देत नसल्यामुळे इस्लामाबादेत उग्र आंदोलन केलं होतं. रास्ता रोको करून मोठे निदर्शने केले होते.
भीक नव्हे, न्याय हवा
यावेळी त्यांनी पार्टी सरकारकडून काही भीक मागत नाहीये. तर आम्ही न्याय मागत आहोत. आमचा पक्ष संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने आमची लढाई सुरू ठेवणार आहे. शातंतापूर्ण निदर्शने केली जाणार आहेत. हाच आमचा मार्ग आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी सोहैल यांनी इमरान खान यांची अटक म्हणजे एक प्रकारचं अपहरण असल्याचं म्हटलं आहे. इमरान खान यांना दीर्घकाळापासून एकांतवासात ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. इमरान खान यांच्या बहिणींनाही त्यांना भेटू दिलं नाही. त्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना भेटू दिलं जात नव्हतं, असा दावाही त्यांनी केलाय.
