रशियाचा दुसऱ्या देशासोबत अत्यंत महत्वाचा करार, यात खरा गेम होणार पाकिस्तानचा, भारताचा काहीही न करता मोठा फायदा
रशियाने एक करार केला आहे. खरंतर त्यांनी ही डील दुसऱ्या देशासोबत केली आहे. यात भारताचा थेट काही संबंध नाहीय. पण या करारामुळे भारताचा फायदा होणार असून पाकिस्तानचा गेम होणार आहे. भारतासाठी ही डील म्हणजे चांगली बातमी आहे.

भारत आणि रशियाची जुनी मैत्री आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया हा भारताचा अत्यंत विश्वासू, जवळचा मित्र आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. रशियाने नेहमीच भारताला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेलं संरक्षण तंत्रज्ञान दिलं आहे. आता रशियाने असाच करार अजून एकादेशासोबत केला आहे. तो देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीला मागच्यावर्षी रशियाने अधिकृत मान्यता दिली. आता रशियाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारसोबत लष्करी सहकार्य करार केला आहे. पॉलिटिकोने हे वृत्त दिलं आहे. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब आणि रशियन संरक्षण परिषदेचे सचिव सर्जी शोइगु यांच्यात बुधवारी या करारावर स्वाक्षरी झाली. हा लष्करी करार नेमका कुठल्या स्वरुपाचा आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. पण दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा हा विस्तार असल्याचं मोहम्मद याकूब यांनी म्हटलं आहे.
“रशियासोबत संवाद आमच्यासाठी महत्वाचा आहे. अफगाणिस्तान आणि रशियामध्ये फार पूर्वीपासून ऐतिहासिक संबंध आहेत. आता आम्हाला ते संबंध विकसित करण्याच्या दिशेने पुढे जायचं आहे” असं अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब म्हणाले. रशियाच्या नेतृत्वाखाली सोवियत युनियनने 1979 साली अफगाणिस्तानवर आक्रमण केलेलं. जवळपास दशकभर सोवियत फौजा अफगाणिस्तानात मुजाहिद्दीन विरोधात लढत होत्या. पुढे त्यातूनच तालिबान आकाराला आली. सोवियत फौजा तिथून निघून गेल्यानंतरही शत्रुत्वाची भावना कायम होती. पुढे जाऊन अमेरिकेने अफगाणिस्तान घुसून युद्ध सुरु केल्यानंतर रशियावर तालिबानला गुपचूप मदत करत असल्याचे आरोप झाले होते.
दोन्ही देशांच्या संबंधात मोठा तणाव
बदलत्या परिस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या गरजेनुसार आता रशिया आणि तालिबान पुन्हा जवळ येत आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं असलं तरी तालिबान राजवटीला त्यांचा विरोधच आहे. रशिया आणि तालिबानमध्ये लष्करी सहकार्य करारामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. कारण अलीकडच्या काळात तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये डुरंड लाईनच्या सीमा रेषेवरुन सशस्त्र संघर्ष झाला आहे. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले. पाकिस्तानने अफगाणिस्तानात नागरी वस्त्यांवर एअर स्ट्राइक केले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. सध्या हा संघर्ष थांबला असला, तरी दोन्ही देशांच्या संबंधात मोठा तणाव आहे.
काहीही न करता भारताचा फायदाच
तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेवरुन अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये दुश्मनी आहे. तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळतो असा पाकिस्तानचा आक्षेप आहे. मूळात या सर्व भागात दहशतवादाचा जनक पाकिस्तानचं आहे.आधी भारताविरोधात पाकिस्तान-तालिबान एकत्र होते. पण आता भारताने तालिबानसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध विकसित केले आहेत. त्यात आता रशिया-तालिबान करार म्हणजे पाकिस्तानची येणाऱ्या दिवसात डोकेदुखी अजून वाढणार आहे. या करारामुळे काहीही न करता भारताचा फायदाच आहे.
