शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार, राज्यावर राष्ट्रपती राजवटीची तलवार
शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray meet Governor) यांच्यासह शिवसेना नेत्यांनी आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray meet Governor) यांच्यासह शिवसेना नेत्यांनी आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. शिवसेनेला (Aaditya Thackeray meet Governor) सत्तास्थापनेसंदर्भात राज्यपालांनी आज संध्याकाळी 7.30 वाजताची वेळ दिली होती. त्यानुसार शिवसेनेने राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने वेळ मागितली आहे. परंतु राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देणे नाकारले आहे. मात्र, आमचा सत्तास्थापनेचा दावा कायम आहे. आम्ही पुन्हा पाठिंब्यासह येऊ. आम्ही 48 तासांचा वेळ मागितला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यपालांनी वेळ नाकारल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची चिन्हं आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आपल्याला सर्वांना माहित आहे की काल संध्याकाळी आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी पत्र देत सत्तास्थापना करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी सुरु केली आहे. आमची वेळी 7.30 पर्यंत असल्याने आम्ही पावणेसात पर्यंत येथे पोहचलो. तसेच आम्ही सत्तास्थापन करु असं कळवलं आहे. इतर पक्षांचा पाठिंबा बाकी आहे. त्या पक्षांची चर्चा सुरु आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 दिवस तरी लागणार आहे. आम्ही तसं राज्यपालांना कळवलं आहे. आम्ही सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन पुन्हा येऊ. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत”.
Aaditya Thackeray, Shiv Sena: We told the Guv that we’re willing to form the govt. We asked him for at least 2 days time but we weren’t given time. The claim (to form govt) wasn’t denied but the time was. We’ll continue to put in efforts to form govt in the state. #Maharashtra pic.twitter.com/BwqSgddKL4
— ANI (@ANI) November 11, 2019
राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे, मात्र, दावा नाकारलेला नाही. सत्तास्थापनेसह शेतकऱ्यांच्या अडचणींवरही आमचं लक्ष आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी आमचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ट्विट –
“शिवसेनेने आज भेट घेऊन सरकार स्थापनेची इच्छा व्यक्त केली. मात्र, आवश्यक संख्याबळाचं आणि पाठिंब्याचं पत्र ते सादर करु शकले नाही. त्यानंतर शिवसेनेने पाठिंब्याचं पत्र सादर करण्यासाठी 3 दिवसांचा अधिक वेळ मागितला. यावर राज्यपालांनी आपली असमर्थतता दर्शवली”, असं ट्विट राज्यपालांनी केलं.
राष्ट्रपती राजवट लागण्याची प्रक्रिया
सरकार स्थापन करताना राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण देतात, त्या पक्षाला यश न आल्यास किंवा असमर्थता दर्शवल्यास राज्यपाल दुसऱ्या पक्षाला बोलावू शकतात.
दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सरकार स्थापन करू शकतो याचा विश्वास राज्यपालांना आल्यास सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळतं.
राज्यपाल त्यांचे स्वेच्छाधिकार (Descretionary powers of governor) वापरून यानंतर राष्ट्रपतींना घटनात्मक कारण (state machinery failed) दाखवून पात्र लिहितात आणि राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात
राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्यपालांकडे सर्व अधिकार असतात. या काळात पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात.
महाराष्ट्रात आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 1980 ला शरद पवार यांचा पुलोद प्रयोग फसल्यानंतर तीन महिने आणि 2014 ला ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर नवं सरकार बनेपर्यंत.
काँग्रेस-राष्ट्रवादीने पत्र पाठवल्याची चर्चा फोल
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र पाठवल्याचं वृत्त आलं होतं. मात्र काँग्रेसने जे पत्र प्रसिद्ध केलं आहे, ते पत्र केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित चर्चा करुन उद्या निर्णय घेऊ अशा आषयाचं आहे. राज्यपालांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्रच मिळालं नाही. त्यामुळे आता शिवसेनेची अडचण झाली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया
“आम्ही एक प्रेसनोट दिली आहे. त्यात हे नमूद केलं आहे की आम्ही सत्तास्थापनेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. उद्या शरद पवार यांना भेटून यावर अंतिम चर्चा होणार आहे”, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
काय होतंय ते पाहूयात. राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला होता, ते काय निर्णय काय घेणार हे पाहावे लागणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया
सोनिया गांधींची शरद पवारांशी चर्चा झाली आहे. आता राष्ट्रवादीशी अंतिम चर्चा केल्यानंतरच निर्णय होईलं, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्यावतीने काढलेल्या पत्रकात शिवसेनेला थेट पाठिंबा देण्याविषयी कोणताही थेट उल्लेख नाही. त्यामुळे काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंच स्पष्ट झालं आहे.