देशासमोर महागाई (Inflation), बेरोजगारी, सीमा सुरक्षा असे गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने आणि भाजपने (BJP) त्यावर जास्त लक्ष द्यावे. मात्र, या सगळ्या गोष्टींवरून अन्यत्र लक्ष वळण्यासाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याबाबत ‘आयबी’ आणि ‘रॉ’बरोबर बोलून फिल्ड इनपूट घेणार आहोत. दंग्यामागे कोणता कट आहे, हे तपासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली. ते नागपूरमध्ये आले असता बोलत होते. वळसे-पाटील म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील सीपींनी बैठका घेतल्या आहेत. आता 3 तारखे नंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वाटत नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. महाराष्ट्रात आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र, आम्ही त्याची काळजी घेत आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.