Lifestyle: पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचं आयुष्य जास्त का असतं? संशोधनातून समोर आली अशी माहिती
पुरूषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक जगतात असं अभ्यासातून समोर आलं आहे. शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडून यावर प्रकाश टाकला आहे. पण पुरूषांचं आयुष्यमान कमी असण्याचं कारण काय ते समजून घेऊयात.

पुरूषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त आयुष्य जगतात याबाबत स्पष्ट अशी कारणं नाहीत. पण शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडून स्त्रियांचं आयुष्य जास्त असतं असं सांगितलं आहे. युक्तिवाद करताना पुरूष आणि स्त्रियांचा जैविक रचना भिन्न असते आणि हेच मुख्य कारण असू शकतं. इतकंच काय तर जीवनशैली, आहार आणि जोडीदार निवडीचे घटकही आयुर्मानात भूमिका बजावतात. यूकेमधील ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन एजिंगच्या संचालिका, प्रोफेसर सारा हार्पर यांच्या मते, “जवळजवळ प्रत्येक देशात, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात.” पण हे प्रमाण प्रत्येक देशानुसार बदलतं. रशिया, युक्रेन आणि व्हिएतनाम देशात स्त्रिया पुरुषांपेक्षा सुमारे 10 वर्षे जास्त जगतात. तर नायजेरियासारख्या ठिकाणी आयुर्मर्यादेतील फरक खूपच कमी आहे. हे निष्कर्ष ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहेत.
प्राध्यापक हार्पर म्हणतात की, रशियातील पुरुषांचे धूम्रपान आणि मद्यपान हे मृत्यूचं मुख्य कारण आहे. इतकंच काय तर पुरूष सहसा आरोग्यदायी आहार घेत नाहीत. तसेच आजारी असताना ते डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता कमी असते. प्राध्यापक हार्पर यांच्या मते, विवाहित पुरुषांना एक फायदा असतो. कारण त्यांच्या पत्नी या बाबतीत अधिक दक्ष असतात. अनेकदा आपल्या पतीला डॉक्टरकडे घेऊन जातात. रस्ते अपघात, हिंसाचार, खून आणि आत्महत्यांमुळे पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. प्राध्यापक हार्पर मते, 1960 आणि 70 च्या दशकात यूकेमध्ये धूम्रपानविरोधी मोहिमांमुळे पुरुषांमधील अकाली मृत्यूचे प्रमाण कमी झाले.
पुरूषांनी सर्व गोष्टींची काळजी घेतली तर स्त्रियांना त्याच्या जास्तीचं आयुष्य जगण्याचं एक कवचकुंडल असते. स्त्री पुरूषातील एक जैविक अंतर आहे आणि ते कायम असणार आहे. स्त्रियांमधील मुख्य घटक म्हणजे इस्ट्रोजेन हार्मोन… यामुळे स्त्रियांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास, रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यास, मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत होते. या उलट पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन काही काळानंतर स्नायूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे हृदयाचे आजार उद्भवू लागतात.
