खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरेंचे तातडीने काही आमदारांना फोन, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, सहा खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता 'मातोश्री'वर हालचालींना वेग आला असून, वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ तीनच खासदार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, पक्षाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्वा खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदारच प्रत्यक्षात उपस्थित होते. तर इतर पाच ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान तेव्हापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. अखेर आता चित्र स्पष्ट झालं आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून, तीन खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आता गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाने आपल्या खासदारांची पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे, सर्व खासदारांना व्हीप लागू करण्यात आला आहे. या बैठकीनंतरच कोण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि कोण नाही? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर आता काही आमदारांना फोन केला आहे. त्यांनी आमदारांना फोन करून विचारपूस केली आहे, तसेच राजकीय परिस्थितीची माहिती देखील घेतली आहे. 19 जूनच्या शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचालींना वेग आला असून, 22 तारखेला उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांचा पक्ष प्रवेश तृर्तास दोन ते तीन दिवस लांबणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट यावर काय आक्षेप घेऊ शकतो, तसेच सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच शिवसेनेकडून या सहा खासदारांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या खासदारांना सुरक्षाच्या कारणांमुळे दिल्लीतून बाहेर हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
