Jay Pawar on Ajit Pawar Plane Crash : VSR ला तत्काळ… अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवार यांची मोठी मागणी
अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर, आता अजितदादांचे पुत्र जय पवार यांनीही मौन सोडले आहे. त्यांनी 'ब्लॅक बॉक्स'मधील सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करत VSR कंपनीची उड्डाणे तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच, कंपनीच्या गंभीर गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबद्दलचं, त्यांच्या निधनाबद्दलचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. 28 जानेवारी रोजी ते मुंबईहून बारामतील विमानाने जात होते, मात्र लँडिंगदरम्यान ते वमान क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर त्यात आणखी काही स्फोट झाले. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचं निधन झालं, तसेच त्यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानातील पायलटस को-पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांनीही जीव गमावला. VSR कंपनीचं हे खासगी विमान होतं. अजित दादांना जाऊन 20 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत, मात्र त्यांच्या या विमान अपघाताचं गूढ काही अजून उकललेलं नाहीये.
त्यातच त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह अनेक नेत्यांनी, अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनीदेखील हा अपघात नसून घातपात नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोह्त पवार यांनी तर अनेक पत्रकार परिषदा घेत अपघातासंबंधी काही मुद्दे उपस्थित केले, त्यातील काही त्रुटी दाखवून दिल्या आणि काही पुरावे सादर करत हा घातपात असू शकतो अशी सपष्ट शंका बोलून दाखवली. त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्यासंदर्भतही रोहित पवार यांनी कंपनीच्या मालकाबद्दलही काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काही लोकांकडून कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली.
जय पवार यांनी केली मोठी मागणी
याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांचा मुलगा, जय पवार यांनीही या विषयावर पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. जय पवार यांनी काही तासांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली असून ती खूप चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एक फोटो टाकला असून त्यासह काही जकूरही पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ब्लॅक बॉक्सबद्दलही लिहील आहे. तसेच VSR कंपनीला उड्डाण चालवण्यास बंदी घालण्याची मोठी मागणीही त्यांनी केली आहे. या पोस्टसह अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच अजित दादांच्या अपघातावर जाहीरपणे प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
काय आहे जय पवार यांची पोस्ट ?
” विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, ” असं जय पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. जय पवार यांनीही व्हीएसआरच्या चौकशीची मागणी करत, रोहित पवार यांच्याप्रमाणे भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

