Earthquake : भूकंपाने मेळघाट हादरले, सहा महिन्यानंतर दुसर्यांदा झटका, प्रशासनाची माहिती काय?
Melghat Earthquake : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील मेळघाट पुन्हा भूकंपाने हादरले. गेल्या आठ महिन्यात दुसर्यांदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. या झटक्यांनी परिसरातील नागरीक घराबाहेर आले. जिल्हा प्रशासनाने याविषयीची माहिती दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेळघाटाला भूकंपाचे पुन्हा हादरे बसले आहे. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. आठ महिन्यांपूर्वीच या भागाला भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा जमीन हालली. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. या भागात सातत्याने जमीन हादरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस या भागाला भूकंपाने हादरा दिला होता.
मेळघाटमध्ये भूकंपाचे धक्के
अमरावतीमधील मेळघाटमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भूकंपाचा झटका जाणवला. 9 वाजून 57 मिनिटांवर 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी जमीन हादरल्याने नागरिक घराबाहेर आले होते. नागरिकांना भूकंपाची जाणीव झाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने 3.8 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. या भूकंपाचे केंद्र हे मेळघाट परिसर होते की इतर याची माहिती अजून समोर आलेली नाही.
गेल्यावर्षी सौम्य धक्के
गेल्यावर्षी 30 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर या तालुक्यांसह काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके बसले होते. अवघे काही सेकंद जमीन हादरल्याने नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. अचानक जमीन हलल्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. अनेकजणांनी घराबाहेर धाव घेतली होती. यामध्ये कोणतीही वित्त आणि जीवितहानी झाली नव्हती. घरातील पलंग हालला. तर शेल्फ, रॅकमधील भांडी खाली पडली होती. जमीन हादरल्याचे नागरिकांना स्पष्टपणे जाणवले होते. काही ठिकाणी घरांना चांगलेच हादरे बसले होते. तर मेळघाटातील चिखलदारा येथील काही घरांना त्यावेळी तडे गेले होते.
आता पुन्हा मेळघाटात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षातून अचानक येणाऱ्या या पाहुण्याने नागरिकांची चिंता वाढवली आहे. हे धक्के तीव्र नसले तरी त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या ताज्या धक्क्यांनी काय नुकसान झालं, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जळगावपर्यंत भूकंपाचे धक्के
मेळघाटासह जळगाव जिल्ह्यातील काही भागांना या सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. जळगाव जिल्ह्यातील रावेर, खानापूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रावेर शहर आणि परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. कुठेही काही हानीची माहिती नाही. रावेर तहसीदार बंडू कापसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला. अनेकांनी धक्का जाणवल्यावर घराबाहेर येत कशामुळे हादरा जाणवला याची माहिती घेतली असता भूकंप झाल्याचे जाणवले. रावेर तहसीदार बंडू कापसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला असून या भूकंपाचा केंद्र बिंदू अमरावती असून सुमारे तीनशे ते चारशे किलोमीटर पर्यंत धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता 3.5 रेक्टर स्केल एवढीअसल्याची नोंद करण्यात आली आहे
