धनंजय मुंडे रात्रीपासून मुक्काम ठोकून, भगवानगड कुणाच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
Dhananjay Munde Bhagwangad Mahant Namdev Shashtri : संकटात कुणालाही देव आठवतोच. सध्या अनेक वादळं झेलणाऱ्या धनुभाऊंनी आत्मशांतीसाठी अध्यात्माची वाट धरली. DPDC ची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले.

संकटात प्रत्येकाला देव आठवतोच. सध्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी आरोपांच्या फैरी झडत आहेत. एकामागून एक आरोपांचे बॉम्बगोळे त्यांच्यावर डागण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्यासाठी भुईकोट केल्याचे विरोधकांचं मत आहे. सर्व बाजूंनी कोलाहल माजले असताना मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडाला शरण गेले. DPDC ची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांच्याशी सगळ्या बाबीवर हितगूज केले. त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आपबित्तीच सांगितली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता भगवानगड कुणाच्या पाठीशी उभा राहिला याची राज्याला उत्सुकता लागली आहे.
धर्मपीठाची राजसत्तेला आवश्यकता
कित्येक हजार काळातील इतिहासाचा धांडोळा घेतला तर, राजसत्तेला धर्मपीठाची आवश्यकता असतेच हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मानवी इतिहासात राजकीय व्यक्तींना अगाध शक्तीचे पाठबळ हवेच असते. त्याच न्यायाने मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम ठोकला. त्यांची व्यथा, त्यांची बाजू, त्यांच्यावरील बालंट, आरोप याविषयी त्यांनी महंतांशी चर्चा केली.




भगवानगड मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आध्यात्मिक चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान गडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर, सामजिक ध्रुवीकरण, समाजातील तेढ यावर भाष्य केले. त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात क्लीनचिट दिली. इतकेच नाही तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला.
काय म्हणाले महंत नामदेव शास्त्री?
“धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही. धनंजय मुंडे यांनी किती सोसावं?” असे नामदेव महाराज शास्त्री म्हणाले.
जातीय सलोख्यावर भर
ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी जातीयता नष्ट करण्याचे काम केले. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकून राहिला. पण राजकारण्यांनी राज्यात जातीयवाद आणला. त्याची झळ आता वारकरी संप्रदायाला सुद्धा बसली आहे. जातीय सलोखा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे काम आहे, असे नामदेव महाराज शास्त्री म्हणाले.