
आजपासून २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी भाविकांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मंदियाळ पहायला मिळाली. शिर्डीतही नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी दिसली. नवीन वर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. नववर्षाच्या स्वागताला मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. सीएसएमटी, दादर परिसराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे मुंबईकरांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ १००० खाटांचे रुग्णालय सुरू होणार आहे. येथे एक छोटे रुग्णालय बांधले जाणार आहे असे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. तसेच येत्या ६ तारखेला बोरिवली राष्ट्रीय उद्यानात वन राणी ट्रेन धावण्यास सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.
धुळे महानगरपालिकेत भाजपाच्या महिला उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 17 ब मधील अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवड बिनविरोध झाली आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपाची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे.
अहिल्यानगरमधील मनसेचे दोन उमेदवार गायब झाले आहेत. गेल्या 24 तासापासून उमेदवारांशी संपर्क नसल्याचं सचिन डफळ यांनी सांगितलं आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा मनसेला संशय आहे.
कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपाचे 5, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीत निकालाआधी महायुती फ्रंटफुटवर आली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “वंदे भारत स्लीपर ट्रेनची संपूर्ण चाचणी आणि प्रमाणन पूर्ण झाले आहे. तिचा पहिला प्रस्तावित मार्ग गुवाहाटी-कोलकाता आहे. येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गावरील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, सुरक्षितता आणि लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासात आधुनिक प्रवासाचा अनुभव देईल.”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. ठाकरे बंधूंचा वचननामा 4 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना होणार आहे. उबाठा शिवसेना आणि मनसे मुंबई महानगरपालिकेत एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील नालागढ येथील पोलिस स्टेशनजवळील रस्त्यावर स्फोट झाला. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना बद्दी पोलिस जिल्ह्याच्या हद्दीत घडली. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज 500 मीटर अंतरावर ऐकू गेला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटामुळे जवळच्या इमारतींच्या आणि लष्करी रुग्णालयाच्या काचा पूर्णपणे फुटल्या.
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब
गेल्या चोवीस तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांची माहिती
केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांच्या अपहरणाचा संशय
उमेदवार अचानक गायब झाल्यानं जिल्ह्यात खळबळ
कल्याण डोंबिवलीत भाजप नंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा डंका
३ उमेदवार बिनविरोध विजयी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेची खेळी यशस्वी
पॅनेल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांची बिनविरोध निवड
सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले माघारी
महापालिका निवडणूक तिकीट वाटपाचा वाद काही थांबेना
नाशिक भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
स्थानिक पोलीसांसह होमगार्ड आणि साध्या वेशातील पोलीस कार्यालयाबाहेर तैनात
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक भाजपमध्ये तिकीट वाटपावरून सुरू आहेत वाद
आज देखील भाजपा शहराध्यक्षांना अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घातला घेराव
निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त
कल्याण डोंबिवलीत भाजपचा चौथा उमेदवार देखील बिनविरोध
डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 27(अ) मधून भाजपच्या मंदा पाटील विजयी
मनसेच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
सुवर्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या उमेदवाराचा विजय
भाजपा पुढे अपक्ष आणि बंडखोर असलेल्या उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. भाजपाचे 18 इच्छुक उमेदवार शिंदे यांच्या शिवसेनेच्या चिन्हावर, तर 13 दादांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर, आणि 12 उबाठाच्या चिन्हावर तर अपक्ष 69 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेलं आहेत. आमच्या भाजपच्या लोकांनी इतर पक्षाच्या सिम्बॉलवर उभे आहेत आणि ते आमच्या विचाराचे असल्याने अर्ज परत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.12 जण आज उमेदवारी अर्ज परत घेतील.तिन्ही पक्षाना उमेदवार नव्हते म्हणून आमच्या लोकांनी तिकडून अर्ज दाखल केले आहेत. वेळेवर उमेदवार शिवसेना सोबत युती तुटली असली ते आमचे कार्यकर्ते शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे आणि ते आमचे ऐकतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे, प्रभाग तीन मधील भाजपा उमेदवार सुनीता व्हनमाने यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी व्हनमाने यांच्या घरावर तसेच त्यांचा मुलगा संदीप व्हनमाने यांच्यावर देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी हल्लेखोरांकडून व्हनमाने यांच्या घरासमोर असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे पॅनलचे उमेदवार सागर व्हनखंडे यांच्या समर्थकांकडुन हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप संदीप व्हनमाने यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज कार्यकर्त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे पोस्टर जाळले.उमेदवारी न मिळाल्याने नाराज एमआयएम पदाधिकारी इम्तियाज जलील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील सिटी चौक परिसरात इम्तियाज जलील यांचे पोस्टर जाळले आहेत.
नाशिक भाजप मधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी केली.निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.नाशिक रोड भागात सुनील केदार एकाच कार्यक्रमाला गेले असता त्यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी केली. गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांनी काढता पाय घेतला.
कुठेही कृपाशंकर सिंग यांचे मराठी भाषेच्या जी आदर आहे त्याच्यावर आमच्याकडून आमची परीक्षा तुम्ही घेऊ नका.मराठी भाषेच्या आदर आहेत आहेत.मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय मोर्चाच्या एक कार्यक्रम होता.. त्या मध्ये लोकांनी विचारलं की उत्तर भारतीय महापौर कधी होईल.तेव्हा मी म्हटले की जास्त नगरसेवक निवडून आणा तर महापौर होईल.कोण महापौर होणार लोकांनी एक भावना व्यक्त केल्या अशी माहिती कृपाशंकर सिंह यांनी दिली. महायुतीचा महापौर बसणार हे खरं आहे असे ते म्हणाले.
नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी कळव्यात शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ठाणे महापालिका मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.स्वीकृत माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. ठाण्यातील आनंद दिघे शक्ती स्थळावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले.
हडपसरचे निवडणूक अधिकारी गणेश मरकड यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याचे कारण देत हे आठही अर्ज रद्द केले आहेत. मात्र उमेदवारांचा आरोप आहे की,ते वेळेत हडपसर क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित होते.शैक्षणिक कागदपत्रे आणण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली होती.तरीही सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत उमेदवारांना कार्यालयात ताटकळत उभे ठेवण्यात आले.आणि संध्याकाळी अचानक अर्ज बाद झाल्याची माहिती देण्यात आली. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये ॲड. कोमल भोसले, प्राची धिवार, शुभांगी आरने, श्रावणी आवडे, आशा आबनावे, रुपाली कांबळे, दिशा प्रवीण पवार, रवी टिंगरे यांचा समावेश आहे.सामाजिक कार्यकर्ते राहुल शेवाळे यांनी याला शौर्य दिनाच्या दिवशी एससी गटातील उच्चशिक्षित महिला उमेदवारांवर केलेला अन्याय असल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचा इशाराही राहुल शेवाळे, महेश नलावडे यांनी दिला आहे.पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे बिनविरोध विजय झाले आहेत. या बिनविरोध निवडीचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप बरोबरच शिवसेना शिंदे गटाने देखील खातं उघडलं आहे.. बुधवारी भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झाला होता आज शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध झाल्याने महायुतीत दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत..
शेतकऱ्यांना भावला ‘मक्या’चा गोडवा आला आहे. 1887 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. गव्हाला मागे टाकत शेतकऱ्यांची मक्याला पसंती दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यात सर्वाधिक मक्याची लागवड करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या शिवीगाळ केल्याचा बाळासाहेब देशमुखांवर आरोप आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या भावाने भाग्यनगर पोलिसात देशमुखांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतल्या हिंदू बांधवांनी विचार करावा… मुंबईतला हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर खान पठाण अब्दुल किंवा बुरखावाली महिला पण बनू शकतो… तेव्हा ठाकरे गटातून कोणाला काही मिरची लागली का ? कोणी बिळातून बाहेर आलं का ? पण कृपाशंकर सिंग जेव्हा उत्तर भारतीयांबद्दल बोलले तेव्हा हे सगळे बिळातून बाहेर आले… ह्या लोकांनी हिंदूमध्ये फुट पाडण्याची सुपारी घेतली आहे.. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार… असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील राख कुटुंबातील सदस्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज वैद्यकिन्ही टोलनाक्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांच्या मालकीच्या असलेल्या या टोलनाका चालकांकडून मारहाण झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी दोषींवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेत टोलनाक्याजवळच ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून पक्षाचे शहर सरचिटणीस अमित घुगे यांनी तिकीट वाटपावरून थेट बंडाचे निशाण फडकवले आहे. तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप घुगे यांनी केला आहे. या गोंधळाचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. अमित घुगे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांच्याच आरोपांमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कालच बडगुजर आणि शहाणे यांना एकाच जागेसाठी दोन ‘एबी’ फॉर्म दिल्याने पक्षात गोंधळ निर्माण झाला होता, त्यातच आता शहर सरचिटणीसांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने नाशिक भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे.
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून, आज प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वाजता वसईतील वाय.एम.सी. (YMC) मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, रवींद्र चव्हाण उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीने या निवडणुकीत ११५ उमेदवार रिंगणात उतरवले असून, बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. या मेळाव्यामुळे वसई-विरारमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज एक हृदयद्रावक अपघात घडला. शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने ओतूर आणि आळेफाटा येथील खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता.
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीवर भाष्य करताना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे चुकीची माहिती पोहोचवण्यात आली, ज्यामुळे त्यांचा गैरसमज झाला. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरच्या पातळीवरून हस्तक्षेप झाल्याने सकारात्मक चर्चा होऊनही युती दुभंगली,” असे खोतकर म्हणाले. युती तुटली असली तरी, आता आगामी काळात जालना महानगरपालिकेवर महापौर आणि जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवणे हाच आमचा मुख्य संकल्प असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि अजित पवार यांच्यावर टीका अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिल्यावरून सुषमा अंधारे यांनी जोरदार निशाणा साधला. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला, असा टोला लगावला. भाजपामध्ये आधीच तडीपार आणि गुन्हेगार आले आहेत. आता भाजपसोबत आपणही गुन्हेगारांना निवडून आणू शकतो, अशी खात्री वाटू लागल्यानेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव असून, उमेदवारांना अभय देण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्रीच सरसावले असतील, तर पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. या सर्व प्रकाराचे श्रेय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाच जाते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
संभाजी ब्रिगेडतर्फे इअर एंड आणि नवीन वर्षानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. बार्शीतील वैरागमध्ये 31 डिसेंबरला दारू नको, दूध प्या असा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. वैराग इथं संभाजी ब्रिगेडतर्फे 1 हजार लीटर दुधाचं मोफत वाटप करण्यात आलं.
नाराज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बंडखोरी करत अपक्ष लढणारे आपले अर्ज मागे घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करून नवीन संकल्प करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आलं होतं. तरीही समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागत आहे. शेगाव शहरात मोठ्या प्रमाणात देशभरातून आलेल्या भाविकांनी शेगाव शहराची वाहतूक सह पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. तर संत गजानन महाराज संस्थानाची पार्किंगसुद्धा फुल झाली आहे.
परळी वैद्यनाथ इथल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर इथं नववर्ष 2026 च्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर भाजपा कार्यालयात उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. दिव्या मराठे यांची भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी भेट घेऊन अखेर नाराजी दूर केली.
4 तारखेला शिवसेना-मनसेचा वचननामा प्रसिद्ध होईल. ठाकरे बंधू एकत्रित वचननामा सादर करणार आहेत. कृपाशंकर सिंह हा भाजपचा बोलका पोपट आहे. मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
राज्यात संविधानाचा भंग करण्याचं काम सुरू आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभा होणार आहेत. ठाकरे बंधू वचननामा एकत्रित सादर करणार आहेत. मीरा-भाईंदर ठाण्यात एकत्र सभा होतील, असं राऊतांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडला आहे. राहुल नार्वेकरांकडून दमदाटी होते, हे सत्य आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी निष्पक्ष असावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
नितीन गडकरींच्या माजी स्वीय सहाय्यकांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. फॉरवर्ड ब्लॉकची उमेदवारी घेऊन निनाद दीक्षित निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
भाजपासह अनेक पक्षांमध्ये कार्यकर्त्ये नाराज झाल्याचे बघायला मिळतंय. पक्षाचे काम करूनही तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहे.
पुणे पिंपरी चिंचवड मध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार. आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. थंडी खूप आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सूचना जे आहे ते देण्यात आलेले आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे.
प्रभाग क्रमांक 15 ब अणि ड या दोन्ही प्रभागामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर सुनावणी होऊन निकाल तब्बल सात ते आठ तासांनी देण्यात आला. मात्र सर्वच अर्ज वैद्य ठरवण्यात आले… भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर यांच्यावर अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांनी संपत्तीवरून हरकत घेतली होती.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संबंधित हा साखर कारखाना आहे. उसाची पहिली उचल 3 हजार रुपये आणि 3500 रुपये भाव द्या या मागणीसाठी कारखाना बंद पाडला. उसाच्या गव्हाणीत उड्या मारत हा कारखाना बंद पाडला. कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरु आहे
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलून गेली. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येतात. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने करण्यासाठी दरवर्षी हजारोच्या संख्येने स्वामींभक्त अक्कलकोटला येतात. यंदाच्या वर्षी देखील तशीच गर्दी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतेय
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. 6 झोनमधील तब्बल 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध, जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने कारवाई करण्यात आली आहे. अनामत रक्कम न भरल्याने अनेक अर्ज बाद झाले आहेत. भाजपसह विविध पक्षांना फटका बसला आहे.
कोल्हापूरमध्ये इनोव्हा कारने उडवल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयानक अपघात झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
सातारा : 31 डिसेंबर निमित्त पार्टीसाठी गेलेला युवक कास पठाराकडे 400 फूट दरीत कोसळला. आदित्य कांबळे असे जखमी युवकाचे नाव आहे. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने युवकाला डोंगराच्या खालील बाजूस असणाऱ्या महादरे जंगलातून त्याला रेस्क्यू करण्यात आलं. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री बिबट्याने थेट घराच्या अंगणात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. श्वानाच्या शोधात असलेला बिबट्या अंगणात शिरताच घरातील धाडसी श्वानांनी त्याच्यावर भुंकत पाठलाग केला, त्यामुळे बिबट्याला पळ काढावा लागला. यामुळे चांगलीच खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली आहेत.
आजपासून 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक तुळजापूरकडे दाखल झाले आहेत.
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. रात्रभरापासून भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे. मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे.