LPG Crisis: मुंबईत नाश्ता, पुण्यात पोळी-भाजी केंद्रातील पदार्थ महाग; सिलिंडर तुटवड्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
एलपीजी सिलिंडर तुटवड्याचा परिणाम आता नाश्त्याच्या किंमतीवरही होऊ लागला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापुरात काय परिस्थिती आहे, ते सविस्तर जाणून घ्या.. कुठे नाश्त्याच्या तर कुठे पोळी-भाजीच्या किंमती वाढल्या आहेत.

एलपीजी सिलिंडर तुटवड्याचा परिणाम आता मुंबईत नाश्त्याच्या किंमतीवरही होऊ लागला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी फुटपाथवर नाश्त्याच्या गाड्या लागलेल्या असतात. असंख्य चाकरमानी या नाश्त्यावर अवलंबून असतात. मुंबईत फुटपाथवर चालणाऱ्या बहुतांश नाश्ता सेंटरवरचे सिलिंडर संपले आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी एलपीजीला पर्याय म्हणून केरोसीनवर चालणारी शेगडी आणि कोळश्याचा शेगडीचा वापर केला जात आहे. यामुळे सकाळचा नाश्ताही महागला आहे. 25 रुपयांना मिळणारे घावणे आता 30 रुपयांना तर 30 रुपयांना मिळणारा डोसा आता 35 रुपयांना मिळत आहे. सिलिंडरच्या तुटवड्याने ग्राहकांची संख्याही घटल्याचं नाश्ता सेंटर चालवणारे म्हणत आहेत.
सिलिंडर संपल्याने खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केरोसीन शेगडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मुंबईच्या करीरोड परिसरात मेदु वडा बनवणाऱ्या स्टॉलवर शेवटचा सिलिंडर संपताच केरोसीन शेगडीवर नाश्ता बनवण्यास सुरुवात झाली. रोज येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याने सिलिंडर तुटवड्याची अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात किंमत आणखी वाढणार असल्याची शक्यता स्टॉलधारकांनी नोंदवली आहे. ब्लॅकने 1700 रुपयापर्यंत मिळणारा सिलिंडर आता 5 ते 6 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने तो घेणे शक्य नाही, त्यामुळे केरोसीन शेगडी वापरतोय, असं स्टॉलधारक म्हणाले.
ठाण्यातील परिस्थिती काय?
ठाण्यातील 60% हॉटेल गॅस सिलिंडर नसल्यामुळे बंद आहेत. तर ठाण्यातील सिंधुदुर्ग, मालवणी मेजवानी असणारे हॉटेल्स आता चूल मांडून जेवण करताना दिसत आहेत. गॅस सिलिंडर नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मालकांना हॉटेलच्या समोरच चूल मांडावी लागत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा आणि लाकडाचा वापर केला जात आहे. गॅस सिलिंडर मिळावे अशी सरकार आणि गॅस एजन्सीकडे मागणी हॉटेल व्यवसाय करत आहेत. तर अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत असून तो रोखावा अशी मागणी देखील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.
सोलापुरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत
एलपीजी सिलिंडर तुटवड्यामुळे सोलापुरात हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गॅसचा तुटवडा असल्याने अनेक पदार्थ मेन्यूमधून काढून ठेवण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली आहे. स्पेशल चहासाठी प्रसिद्ध असलेल्या गुरुप्रसाद हॉटेललाही याचा फटका बसला आहे. “आमची खासियत असलेले पदार्थ आम्हाला बंद ठेवावे लागत आहेत. गॅस तुटवड्यामुळे आम्ही अनेक पदार्थ बंद ठेवले आहेत. आमच्याकडे दहा कामगार आहेत, मात्र गॅस तुटवड्यामुळे कामगार कमी करण्याची वेळ आली आहे. जर गॅसच मिळाला नाही तर आम्हाला देखील हॉटेल बंद ठेवावं लागेल आणि कामगारांची उपासमार होईल,” अशी चिंता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील पोळी-भाजी केंद्रांवर परिणाम
एलपीजी सिलिंडर तुटवड्याचा परिणाम पुण्यातील पोळीभाजी केंद्रांवरही झाला आहे. पुण्यातील देशपांडे किचनमधील पदार्थ महागले आहेत. या पोळीभाजी केंद्रात पाच रुपयांना मिळणारी चपाती आता दहा रुपयांना मिळत आहे. पुण्यातील अनेक चाकरमानी मेस, हॉटेल्स, पोळीभाजी केंद्र यांवर अवलंबून असतात. पुण्यातल्या देशपांडे पोळी भाजी केंद्रातून आयटी कंपन्या, रुग्णालये आणि विविध संस्थांमध्ये दिवसाला जवळपास 30 हजार चपात्या पुरवल्या जातात. परंतु सिलिंडर तुटवड्यामुळे यावरही परिणाम झाला आहे.
