…तर अशोक खरातलाच सुरक्षा सल्लागार केलं असतं; सभागृहात फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?
सध्या राज्यभरात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. त्याच्यावर आतापर्यंत एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं? ते पाहुयात.

सध्या राज्यभरात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. त्याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. तसेच ज्यांच्या ज्यांच्याकडे या संदर्भातील काहीही माहिती आली असेल तर ती माहिती शासनाकडे द्यावी. या प्रकरणाची पाळंमुळं खोदून या व्यक्तीला दंडीत करायचं आहे. इतरांनाही जरब बसली पाहिजे, अशी शिक्षा करायची आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आपण कुठे जातोय? या प्रकरणाने दिसून आलं आहे. आत्मविश्वास असावा पण अति नसावा. आपण श्रद्धा पाळणारे आहोत, अंधश्रद्धा नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत थीन लाईन आहे. ही लाईन व्हायलेट होते तेव्हा काय होते? हे आपण पाहिलं आहे. अंधश्रद्धने कसा विवेक हरवतो हे या प्रकरणात आपणं पाहिलं आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, चोखामेळा, गाडगेबाबा सेवालाल महाराज अशी थोर संत परंपरा असलेला महाराष्ट्र आहे. या सर्वांनी देवाचं अस्तित्व नाकारलं नाही, पण अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत हे प्रकरण आहे. त्यात हीच संतांची शिकवण महत्त्वाची आहे. या प्रकरणातून सरकार आणि समाज म्हणून प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, पण भोंदुगिरीला स्थान मिळता कामा नये.
जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम झाले नाहीत, हे मान्य आहे. पण ते अंतिम टप्प्यात आहेत. सेक्शन ३ कार्यरत असल्याने नियमांचा अडसर होत नाही. या प्रकरणात कायद्याची अंमलबजावणी केली आहे. जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर भोंदू खरातला ट्रम्प यांचा सल्लागार नेमलं असतं, सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं असतं, त्यामुळे लगेच विषय संपले असते. युद्ध ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. दहशतवाद्यांना इथे बसूनच टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. सीमेवर सैनिक पाठवण्याची गरज पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते, आपली सीमा सुरक्षित झाली असती. आपल्याला प्रचार सभा घ्यायला लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सर्व निवडणुका जिंकता आल्या असत्या, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
