भाजप उमेदवारावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; स्पष्ट म्हणाले..
नागपुरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. फडणवीसांना शिंगणेंची भेट घेतली आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 11 चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रभागातील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भूषण शिंगणे यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. शिंगणेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “या कुठल्याही दहशतीला आमचा पक्ष घाबरणार नाही. यासंदर्भात आधी इंटिमेशन दिल्यानंतरही पोलिसांनी योग्य कारवाई केली, असं सर्वांचं मत आहे. त्याचीही चौकशी करणार. तक्रार दिल्यानंतरही ज्या गंभीरतेनं या घटनेकडे बघायला पाहिजे होतं, तसं बघितलं गेलं नाही. मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे, त्यामुळे कुठलाही गुन्हेगार त्यातून सुटणार नाही.”
“नागपुरात काँग्रेसने गुंडांना तिकिट दिलंय. काँग्रेसच्या अशाच एका गुंडाकडून शिंगणेंवर हल्ला करण्यात आला आहे. मुळात दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही. कोणी केलं तर पोलीस त्यांना ठोकून काढतील. कोणत्याच प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दुबार मतदारांच्या आरोपांवर फडणवीस पुढे म्हणाले, “दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने करेल. आत बसलेल्या एजंटने त्यावर आक्षेप घ्यायला हवा. कोणी दुबार मतदान केलं तर आम्हीही त्यावर आक्षेप घेऊ. पण हे मारामारी करणारे कोण आहेत. मतदान कमी झालं पाहिजे, याकरिता केलेला हा प्रयत्न आहे.”
दरम्यान हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्याला आणि नाकाला जबर मार लागला असून त्यांचा हातसुद्धा फ्रॅक्चर झाला आहे. गोरेवाडा परिसरात काहीजण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोबत पैसेसुद्धा वाटत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे पाहणीसाठी गेलेल्या भूषण शिंगणेंवर हल्ला करण्यात आला. शिंगणेंना बघताच तिथं असलेल्या 40-50 जणांनी त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. भूषण शिंगणे इथून जिवंत जाऊ नये, अशीच मारहाण त्यांना करण्यात आल्याचं शहराध्यक्ष तिवारी यांनी सांगितलं.
