AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्का, ट्विस्ट, भूकंप, पुन्हा ट्विस्ट आणि अश्रू…, कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय नाट्य; काय-काय घडलं?

कोल्हापुरात प्रचंड राजकीय उलथापालथनंतर अखेर काँग्रेस नेत्यांनी राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राजेश लाटकर हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. पण या घोषणेआधी ज्या घडामोडी घडल्या त्या कोल्हापूर उत्तरमध्ये कधीच घडल्या नव्हत्या.

धक्का, ट्विस्ट, भूकंप, पुन्हा ट्विस्ट आणि अश्रू..., कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय नाट्य; काय-काय घडलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 05, 2024 | 8:43 PM
Share

पृथ्वीच्या भूगर्भातही भूकंप येण्याआधी कंप घडले नसतील तेवढे कंप कोल्हापूरच्या राजकारणात बघायला मिळाले. कोल्हापुरात काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडींनी ट्विस्ट निर्माण केला, उमेदवारीसाठी असणारी रस्सीखेच दाखवली आणि मुख्य म्हणजे कोल्हापुरातील काँग्रेसचा दिग्गज नेता म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना अक्षरश: कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडायला भाग पाडलं. इतका ट्विस्ट, गोंधळ आणि डोळ्यांमधून निघालेल्या अश्रूंनंतर अखेर जिथून सुरुवात झाली तिथेच काँग्रेस पक्ष येऊन पोहोचला. पण या घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा या निवडणुकीसाठी जास्त महत्त्वाची ठरताना दिसत आहे.

सर्वात आधी नेमकं झालं काय? ते आपण समजून घेऊयात. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये खल झाले. सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी झालेल्या बैठकीत राजघराण्यातील कुणीही निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचं शाहू महाराजांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे काही नावांवर चर्चा झाली आणि अखेर राजेश लाटकर यांना उमेदवारी निश्चित झाली. सतेज पाटील यांनी काँग्रेस हायकमांडकडे राजेश लाटकर यांचं नाव दिलं. पण राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूरच्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी बघायला मिळाली.

आधी राजेश लाटकर यांचं तिकीट कापलं

राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी तडकाफडकी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर राजघराण्याचील मधुरिमाराजे यांच्या समर्थकांकडून मधुरीमाराजे यांचं नाव पुढे करण्यात आलं. राजघराण्याच्या समर्थकांनी ही मागणी इतकी लावून धरली की अखेर सतेज पाटील यांच्यावरचा दबाव वाढला. त्यामुळे पुन्हा बैठक बोलावण्यात आली. यावेळी राजेश लाटकर यांना परत कधीतरी संधी दिली जाईल, अशा विचारातून मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्याबाबतचा निश्चय झाला. सतेज पाटील यांनी पुन्हा काँग्रेस हायकमांडला विनंती करत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याबाबत विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार, पक्षाने उमेदवारांची पुढची यादी जाहीर करताना मधुरिमाराजे यांची उमेदवारी जाहीर केली.

मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राजेश लाटकर यांची पक्षाकडची उमेदवारी साहजिकच रद्द झाली. पण राजेश लाटकर हे उमेदवारीसाठी हट्टाला पेटले. त्यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. खरंतर राजेश लाटकर हे सतेज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्यानुसार सतेज पाटील यांनी मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती देखील केली. पण राजेश लाटकर उमेदवारीवर ठाम राहिले. यानंतर मधुरिमाराजे यांना निवडून आणण्यासाठी आपण आपली पूर्ण ताकद पणाला लावू, असं सतेज पाटील यांनी मनाशी ठाम केलं.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत होत्या तर दुसरीकडे राजेश लाटकर उमेदवारी अर्ज मागे न घेत असल्यामुळे राजघराण्यातच मधुरिमा यांच्या उमेदवारीबाबत नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. असं असताना सतेज पाटील मधुरिमाराजे यांच्यासाठी सर्व ताकद लावणार होते. या सर्व घडामोडी घडत असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उजाडला. या दिवशी सकाळीच खासदार शाहू महाराज राजेश लाटकर यांच्या घरी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यासाठी गेले. पण राजेश लाटकर हे त्यांना भेटले नाहीत. राजेश लाटकर तेव्हापासून नॉट रिचेबल होते. ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या घटकापर्यंत नॉट रिचेबल होते.

सतेज पाटील यांना संताप, नंतर कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडले

राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे मधुरिमाराजे यांनी तडकाफडकी शेवटच्या 10 मिनिटात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे मधुरिमाराजे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली होती. पण त्यांनी थेट अर्ज मागे घेतला. ते अर्ज मागे घेणार याची भणक सतेज पाटलांना लागली. ते तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला रवाना झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि शाहू महाराजांनी त्यावर स्वाक्षरी देखील केली होती. यामुळे सतेज पाटील प्रचंड संतापले. त्यांचा संताप कॅमेऱ्यातही कैद झालेला बघायला मिळाला. या सर्व घडामोडींचा सतेज पाटील यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. त्यामुळे आज सकाळी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यकर्तेदेखील भावूक झालेले बघायला मिळाले.

अखेर राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर

इतक्या सर्व घडामोडी घडल्यानंतर कोल्हापुरातील काँग्रेस नेत्यांनी अखेर राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर केला. राजेश लाटकर हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना काँग्रेसने जाहीर पाठिंबा दर्शवला. शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. “गेल्या काही दिवसात काही घटना घडल्या, काही गोष्टी घडल्या, ते सर्वांना माहीत आहे. मात्र यापुढे आपले काही ध्येय धोरण ठरवायचे आहेत. महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात एकसंघपणे एकत्र लढायचं आहे. सर्व घटकांसाठी लढायचं आहे. कोल्हापूर उत्तरसाठी जो पाहिला उमेदवार मिळाला होता तो काँग्रेस चिन्हावर लढू शकत नाही. मात्र तो अपक्ष लढू शकतो. त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. आज आपण काही निर्णय घेत आहोत. आम्ही आज सर्वानुमते राजू लाटकर यांना पाठिंबा देत आहोत”, असं शाहू महाराजांनी जाहीर केलं.

शाहू महाराज काय म्हणाले?

“राजेश लाटकर यांचं चिन्ह प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजत आहे. ती चांगली शिजली पाहिजे. येत्या २० तारखेपर्यंत आपण राजू लाटकर, काँग्रेस आणि आघाडीच काम जोमाने करायचं आहे. सगळे मिळून आपण राजेश लाटकर या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यायचं आहे. हा निर्णय सध्या वेगळ्या वातावरणात वेगळ्या उद्देशाने आणि विचार स्पष्ट करून घेतला आहे. या निर्णयामुळे कोणाला काही त्रास होणार नाही”, असंही शाहू महाराजांनी स्पष्ट केलं.

राजू लाटकर यांची पहिली प्रतिक्रिया काय?

यावेळी सतेज पाटील यांनी फार काही बोलणं टाळलं. “काल आणि आज काही चर्चा झाल्या. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही चर्चा झाली”, असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं. राजेश लाटकर यांनीदेखील यानंतर प्रतिक्रिया दिली. “मला काँग्रेस, इंडिया आघाडीने पाठिंबा दिला याबद्दल आभार. मी तुम्ही ठेवलेला विश्र्वास तुटू देणार नाही”, असं राजेश लाटकर म्हणाले.

Follow Us
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ