बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 विधेयकावर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी विधेयकातील तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या तरतुदीनुसार आता सक्तीचे धर्मांतर, इच्छेविरुद्ध धर्मांतर आढळून आले तर कठोर कारवाई केली जाणार आहे. सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि 5 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे. असे असतानाच आता सक्तीच्या धर्मांतरातून जन्माला आलेल्या बाळाचा कोणता धर्म असेल? असे विचारले जात होते. याबाबतची कायद्यातील तरतूद समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार “कायद्याचे उल्लंघन करून धर्मांतर केले तर त्यात सामील असलेली व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असतील. अशा प्रकारचे धर्मांतर झालेले नाही असे मानले जाईल. बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न झालेले असेल तर त्याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मुलाचा धर्म नेमका काय असेल?
तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयांनुसार या कायद्यात तरतूद केलेली आहे. बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द असल्याचे घोषित केले जाईल. त्यातून जन्माला आलेला बालक हा आई ज्या पूर्वाश्रमीच्या धर्माची असेल तोच मुलाचा धर्म मानला जाईल. त्या मुलास वडिलांकडे उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र कायम असेल. तसेच संबंधित आई ही पोटगी मागू शकते. अशा प्रकरणांत बाळाचा ताबा हा आईकडे असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. या विधेयकात कोणत्याही एका धर्माला विरोध केलेला नाही. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले. तसेच विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कायदेशीर आव्हान दिले जाऊ नये यासाठी भास्कर जाधव यांनी काही सूचनाही दिल्या आहेत.
