धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक; म्हणाले जर असा अपमान…
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांवर इतिहासाच्या मोडतोडीचा आरोप केला आहे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यात गुरु-शिष्याचे नाते असल्याचा दावा करत धीरेंद्र शास्त्री यांनी एक किस्सा सांगितला होता. या विधानावर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत भाजप रस्त्यावर उतरली असती. छत्रपती शिवरायांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतात, तुम्हाला कुठून हे सुचतंय, असा सवाल संजय राऊतांनी केला.
आमचा महाराष्ट्रदेखील कधी थकत नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरसंघचालक या दोन प्रमुख व्यक्ती आहेत. यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे भान असायला हवे. त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा-महाराजांना आणून इतिहासाची मोडतोड करण्याचे कारण काय? शिवाजी महाराज हे आपल्या ऊर्जेचा, उत्साहाचा आणि शौर्याचा अखंड प्रवाह आहेत. ते कधी थकले नाहीत आणि कधी झुकले नाहीत. म्हणूनच आमचा महाराष्ट्रदेखील कधी थकत नाही आणि दिल्लीपुढे कधी झुकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या भावना आणि इतिहासाची जाणीव करुन द्यायला हवी
हे जे बाबा वगैरे आणले जातात, त्यांचा जो काही नवीन हिंदुत्ववाद सुरू झाला आहे, ज्याद्वारे नवीन इतिहास लिहिला किंवा बदलला जातोय, हे महाराष्ट्राला मान्य नाही. जेव्हा ते तरुण बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर चुकीचे बोलत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवे होते. त्यांना महाराष्ट्राच्या भावना आणि इतिहासाची जाणीव करून द्यायला हवी होती, अशा शब्दात संजय राऊतांनी खडसावले.
एक मुलगा भारतीय सैन्यात पाठवा, असं ते का म्हणाले नाहीत
ते या पृथ्वीतलावरील महान व्यक्ती नव्हेत. त्यांचे वय काय? अभ्यास काय? ते म्हणतात की चार मुले जन्माला घाला. तुम्ही स्वतः ब्रह्मचारी आहात, तुमचे अजून लग्नही झालेले नाही. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांना सांगायचे की चार मुले जन्माला घाला आणि एक मूल आरएसएसला द्या. जे कोणी संत महाराज आहेत, त्यांनी स्वतःपासून ही सुरुवात करायला हवी. हे हिंदुत्व नाही. एका बाजूला सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मंत्रालय स्थापन करते, कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून लोकसंख्या वाढवण्याचे सल्ले दिले जातात. एक मुलगा भारतीय सैन्यात पाठवा असे ते का म्हणाले नाहीत? असा सवालही संजय राऊतांनी विचारला.
त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजिबात प्रेम नाही
महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं हे जर दुसऱ्या कोणी केलं असतं तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत रस्त्यावर उतरले असते. छत्रपती शिवरायांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतात, तुम्हाला कुठून हे सुचतंय? ते पुस्तक ४० वर्षांपूर्वीचे आहे. त्या पुस्तकात कुठेही छत्रपती शिवरायांची बदनामी नाही. यांच्या महाराष्ट्राविषयीच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजिबात प्रेम नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
