ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!
ज्यांना लोक निवडून संसदेत पाठवतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात काम व्हावे, अशी त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. जेवढे सहा खासदार आमच्याकडे आले आहेत, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर ठाकरे यांच्या पक्षाला जबर धक्का बसला. पक्षामध्ये पुन्हा नवचेतना निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. असे असतानाच आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने लोकसभा सचिवालयाने तसे पत्रक काढले आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जनतेप्रती असलेली जबाबदारी…
आम्ही कोणताही पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करतो. त्यामुळेच आमच्याकडे जे सहा खासदार आले, त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते आमच्याकडे आले आहेत. आमची त्यांना पूर्ण साथ असेल. त्यांच्या मतदारसंघात चांगले विकासकाम होईल. त्यांना चांगला विकासनिधी मिळेल, असे आश्वास त्यांनी दिले.
वैयक्तिक स्वार्थासाठी ते आमच्याकडे आलेले नाहीत
तसेच, ज्यांना लोक निवडून संसदेत पाठवतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात काम व्हावे, अशी त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. जेवढे सहा खासदार आमच्याकडे आले आहेत, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला नाही. जे आमच्यावर आरोप करतात, त्यांना हे खोटे वाटेल. वैयक्तिक स्वार्थासाठी ते आमच्याकडे आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या सहा खासदारांना आम्ही निधी देणार आहोत. त्यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्या खासदारांची भेट करून दिली, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. पक्षांतर केलं की पैसे घेतले, असा आरोप केला जातो. एखादा नेता जेव्हा त्यांच्यासोबत असतो, तोपर्यंत तो चांगला असोत. पक्षांतरानंतर लगेच संंबंधित नेता वाईट होते. लोक आपल्याला का सोडून जात आहेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
