नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना खळबळजनक वक्तव्य केलं होतं. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सहमतीनेच झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. वेगवेगळे पक्षाचे नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. यावर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.
‘ही सत्य गोष्ट आहे. आम्हाला हे माहित होतं. राजकारणात माहिती ठेवावी लागते. ही पवारांनीच केलेली खेळी होती. त्यांची पंरपरा सगळ्यांना माहित आहे. फडणवीस जे म्हणताय ते १०० टक्के खरं आहे. असा दावा देखील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय.
कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजुनेच लागणार. मेजोरिटी आमच्याच बाजुने लागणार याबाबत कुठे ही शंका नाही. कायद्यानुसार निकाल आमच्याच बाजुने लागणार आहे.
दहा आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. अडचणीमुळे ते समोर येऊ शकत नाहीत. पण ते म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहे.ठाकरे गटाकडे ५ आमदार उरतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘उद्धव ठाकरे यांची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु होती. तेव्हा आमच्याकडे ऑफर आली स्टेबल गर्व्हमेंट स्थापन करण्याची. जी काही चर्चा झाली ती शरद पवार यांच्यासोबत झाली होती. आधी गोष्टी ठरल्यानंतर त्या नंतर कशा बदलल्या हे नंतर सगळ्यांनी पाहिलं आहे.’