LPG Shortage : गॅस टंचाईने फुटला घाम, शेणींना सोन्याचा भाव, स्वयंपाकासाठी शेणाच्या गोवऱ्यांची तुफान विक्री
इस्रायल-इराण संघर्षामुळे भारतात इंधन आणि एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याचे थेट परिणाम सामान्य नागरिक व हॉटेल व्यवसायावर होत आहेत. गॅसअभावी अनेकजण इंडक्शन किंवा पारंपरिक चुलीचा वापर करत आहेत. परिणामी, शेणाच्या गोवऱ्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, त्यांची विक्री तेजीत आहे. या परिस्थितीने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात चालना मिळाली आहे.

इराणवर इस्रायल-अमेरिकेने चढवलेलला हल्ला., त्यानंतर युद्धाला फुटलेलं तोडं, याला आज 15 दिवस उलटून गेले आहेत. पण तीन देशांच्या या युद्धाच्या अख्ख्या जगाला फटका बसत असून अनेकांना त्याची झळ पोहोचली आहे. भारताला युद्धाचे चटके बसत असून इंधन टंचाईमुळे , गॅसच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्राही गॅसची टंचाई असून लोकं पॅनिक झाले आहे, गॅसऐवजी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापरक करत आहेत. मात्र मोठे व्यवसाय, हॉटेल मालक यांनाही सिलेंडरचा तुटवडा भासत असून अनेकांनी चुलीकडे मोर्चा वळवला.
तर काहींनी आता स्वंपाकासाठी पारंपारिक मार्ग निवडला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे lpg गॅस सिलेंडरच्या वितरणावरती निर्बंध आले असल्याने आता शेणाच्या गोवऱ्यांना मागणी वाढली आहे. जळगावात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांची विक्री वाढली आहे. व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे.
गोवऱ्यांची वाढली मागणी
अनेकांनी चुलीचा पर्याय वापरायला सुरुवात केल्याने लाकडांबरोबरच, म्हशीच्या तसेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात धूर होत असल्याने त्याला पर्याय म्हणून, तसेच चूल लवकर पेटण्यासाठी शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सुरुवातीला कवडीमोल असलेल्या तसेच गोवऱ्यांची आता चांगली विक्री होत असून भावही वाढला आहे.
दोन पैसे मिळत असल्याने आर्थिक हातभार लागत असल्याचे पशुपालकांनी सांगितलं आहे. संपूर्ण दिवसभरात महिला मजुरांच्या माध्यमातून 600 ते 700 गोवऱयां तयार केल्या जात असून त्यापैकी किमान 500 गोवऱ्यांची रोज विक्री होते. घरगुती वापराबरोबरच तसेच हॉटेल व्यवसायिकांकडून मागणी वाढली असून एक दिवस आधीच बुकिंग करून गोवऱ्या घेऊन जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. 7 रुपये तसेच 10 रुपयाला एक याप्रमाणे गवऱ्यांची विक्री होत असून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शेणापासून तयार होणाऱ्या गवऱ्यांना अच्छे दिन आल्याचा पाहायला मिळत आहे.
इडली सोबत केवळ चटणी मिळेल, सांबार संपले
‘इडली सोबत केवळ चटणी मिळेल, सांबर संपले आहे’, अशा आशयाचे बोर्ड सोलापुरातील सुप्रसिद्ध सुधा हॉटेल बाहेर लावण्यात आले आहेत. सोलापुरातील हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने असे बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. आमचे इडली चटणी सोबत सांबार ही खासियत आहे. मात्र गॅस संपल्यामुळे आम्ही इडली चटणीसोबत सांबर देऊ शकत नाही. आमच्या ग्राहकांना इडली चटणी सोबत सांबर लागते. त्यामुळे सांबर संपले आहे असा बोर्ड लावण्याची वेळ आमच्यावर आली. याशिवाय आमच्या दुसऱ्या शाखेत आम्ही चूल पेटवली आहे. मात्र चुलीवरील चव ग्राहकांना आवडते की नाही हे आज पाहणार असं हॉटेल चालकांनी सांगितलं.
चुलीकडे वळले हॉटेल मालक
अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या ‘एलपीजी सिलिंडर’ पुरवठ्यावर निर्बंध आणले. त्यामुळे काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने शहरातील अनेक मोठ्या हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे सुरू केले आहे. काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये विटांची चूल तयार केली आहे.ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अहिल्यानगर शहरात देखील सावेडी गाव परिसरात असलेल्या जय आनंद या खानावळ चालकाने व्यवसाय टिकवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
बुलढाण्याच्या टीबी हॉस्पिटल मधील स्वयंपाक घरातून एका गॅस सिलेंडरची चोरी
संपूर्ण देशभरात गॅस तुटवड्यामुळे मोठी तारांबळ उडाली असून, बुलढाण्यातील टीबी हॉस्पिटल मधील स्वयंपाक घराची खिडकी आणि दरवाज्याची कडी कोंडा तोडून 17 सिलेंडर पैकी एक भरलेले सिलेंडर आणि इतर साहित्य चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर तांब्याची ऑक्सिजनची पाईपलाईन देखील काढून देण्यात आली आहे. असा एकूण दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचा तपास बुलढाणा पोलिस करत आहेत.
इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम, हॉटेलच्या मेन्यूमध्ये कपात
इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी चुलीवर जेवण बनवणं सुरू केलं तर इतर हॉटेल व्यवसायिकही चुली बनवत आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी केली मेनू मध्ये कपात करण्यात आली आहे. तर चुलीवरचे जेवण परवडत नसल्याने काही दिवस हॉटेल बंद करण्याचा निर्णय अनेक हॉटेल चालकांनी घेतला आहे.
वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार
वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड झाला असून शिधावाटप विभागाने मोठी कारवाई करत निमेश जैनवर गुन्हा दाखल आहे. मात्र टेम्पो मालक फरार झाला आहे. मुंबईच्या वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा शिधावाटप विभागाने पर्दाफाश केला आहे. वरळी नाका येथील ‘सूरजी वल्लभदास चाळ’ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.
मुंबईतील खाऊ गल्लीत खवय्यांचे हाल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दुकानदारांकडे कमर्शियल गॅसचा पुरवठाच नसल्याने अखेर इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. सरकार मूर्ख बनवतंय, आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीये अशी खंत दुकानदार व्यक्त करत आहेत. गॅस नाही, त्यामुळे गावी जातोय अशीही प्रतिक्रियाही काही दुकानदार देत आहेत.
