ऋतुजा आणि गौरवचं ब्रेकअप, एक मेल आणि MPSC चा पेपरफुटी कांड; लव्हस्टोरीमुळं सगळं उद्ध्वस्त कसं झालं?
इकडे पेपर फोडल्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा झाली आणि या परीक्षेत ऋतुजा पाटील पात्र ठरली. मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटील यांच्यात मोठा वाद झाला. वादानंतर ब्रेकअप झाल्याने गौरव पाटील याने स्वत: ऋतुजाविरोधात एमपीएससीत तक्रार केली होती.

MPSC Paper Leak : MPSC ने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या परीक्षेचा पेपर अगोदरच फुटला होता, असा आरोप झाल्यानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी याच पेपरफुटीमुळे आक्रमकही झाले होते. दरम्यान एका प्रेमप्रकरणामुळे हा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. परंतु या पेपरफुटीत प्रेम प्रकरणाचा अँगल समोर आला असला तरी, पेपर कुठे फुटला, तो कोणाकडून कुठे गेला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबतची आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमका पेपर कसा फुटला? प्रेमाचा अँगल काय?
एक परीक्षा राज्यभरात घ्यायची म्हणजे त्यासाठी कित्येक महिने अगोदरपासूनच नियोजन करावे लागते. अशा परीक्षांचे नियोजन करायचे असेल तर त्यासाठी काही आर्थिक तरतूदही करावी लागते. परंतु पेपर फुटी प्रकरणाला लव्ह स्टोरी जबाबदार असेल तर त्यासाठी हे खूपच दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एमपीएससीच्या अव्वर सचिवांचाही समावेश आहे. अभिजीत लेंडवे असे अटक करण्यात आलेल्या अव्वर सचिवांचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांचाही समावेश आहे. परीक्षार्थी ऋतुजा पाटील तिचे वडील अमृत पाटील यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
लव्ह स्टोरीचा नेमका अँगल काय?
मिळालेल्या माहितीनुसर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेमप्रकरणामुळे पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी एका दलालाकडून परीक्षेच्या दोन दिवस आधी पेपर फोडला होता. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. मात्र ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी गौरव पाटीलालाही पेपर दिला होता. त्यानंतरच मग पेपर फुटीचं हे प्रकरण घडलं.
इकडे पेपर फोडल्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा झाली आणि या परीक्षेत ऋतुजा पाटील पात्र ठरली. मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटील यांच्यात मोठा वाद झाला. वादानंतर ब्रेकअप झाल्याने गौरव पाटील याने स्वत: ऋतुजाविरोधात एमपीएससीत तक्रार केली. नंतर काही दिवसांनी गौरव पाटीलने एमपीएससीला पुन्हा एक मेल केला. या मेलमध्ये त्याने मी मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केला असेही कळवले होते. तोपर्यंत मात्र पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आणि त्यांचे बिंग फुटले.
