अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला? मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला विमान वाहतूक मंत्र्यांचं उत्तर, केला मोठा खुलासा
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवलं होतं.

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ते मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, घटनास्थळी मोठा स्फोट झाला, आणि विमानाला आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना या अपघातासंदर्भात एक पत्र पाठवलं होतं, त्याला आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे.
अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला, आणखी चार जणांनी देखील या अपघातात आपले प्राण गमावले. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी या पत्रातून फडणवीस यांनी मागणी केली होती, तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावेत असंही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी उत्तर दिलं आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहेत. विमान अपघात आणि घटनेचा नियमांनुसार तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची देखील यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, असं नायडू यांनी म्हटलं आहे.
