Laadki Bahin : ई-केवायसीनंतर एका झटक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या तब्बल इतक्या लाखांनी घटली
लाडक्या बहिणींकडून ई-केवायसीचे अर्ज भरताना चुकीचे पर्याय निवडले गेले किंवा काही तांत्रिक चुका झाल्याने त्यांच्यावर अपात्र ठरण्याची टांगती तलवार होती. दरम्यान ई-केवायसीनंतर एका झटक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या घटली आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC : ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2.4 कोटींहून अधिक लाभार्थी महिला होत्या. परंतु ई-केवायसीद्वारे पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2025 महिन्यात फक्त 1.6 कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला. जानेवारी महिन्याच्या मध्यात हा हप्ता मिळाला होता. म्हणजेच एकूण 86 लाखांच्या लाभार्थ्यांचा घट झाला आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र ही मुदत फक्त चुका दुरुस्त करण्यासाठी आहे. नव्याने केवायसी करण्याची मुदत संपली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येतेय.
महिलांनी भरलेला चुकीचा फॉर्म
सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत 2.4 कोटींहून अधिक लाभार्थ्यांपैकी फक्त 1.9 कोटी महिलांनी ई-केवायसी केलं. यापैकी ज्या महिलांचे ई-केवायसीचे तपशील अचूक होते, अशा जवळपास 1.6 कोटी महिलांना डिसेंबर 2025 साठीचा हप्ता मिळाला. ई-केवायसी करताना अनेक महिलांनी फॉर्म चुकीचा भरला होता. ‘तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी करत नाही ना’, असा प्रश्न ई-केवायसी भरताना विचारण्यात आला. तेव्हा अनेक महिलांनी त्यावर ‘नाही’ असं उत्तर देण्याऐवजी होकारार्थी पर्याय निवडला होता.
जानेवारीचा हप्ता थकीत
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यातील हप्तासुद्धा अद्याप मिळाला नाही. याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या योजनेचा निधी अद्याप ज्या विभागांद्वारे वितरित करण्यात येतो, त्यांच्याकडून तो पूर्णपणे मिळालेला नाही. या योजनेचा लाभ पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. परंतु ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली, तर काहींकडून चुकीच्या नोंदी झाल्या.
ई-केवायसीबद्दल महिला व बालविकास मंत्री अदित तटकरे म्हणाल्या होत्या, “ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषकरून ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
