Maharashtra Budget : फडणवीसांकडून विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, थेट अमेरिकेत जाता येणार, नवी योजना काय?
महाराष्ट्र अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युसिटीची उभारणी आणि 'मुख्यमंत्री विज्ञान वारी' अंतर्गत विद्यार्थ्यांना नासा (NASA) भेटीची संधी मिळणार आहे, वाचा सविस्तर बातमी.

महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, क्रीडा, शिक्षण यांसह विविध घटकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. यावेळी राज्य सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी पावले उचलल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक शैक्षणिक केंद्र (Global Education Hub) बनवण्यासाठी देवेंद्र फडणीवासांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये नवी मुंबईत देशातील पहिली एज्युसिटी उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
नवी मुंबईत इंटरनॅशनल एज्युसिटी साकारणार
राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी नवी मुंबई विमानतळ परिसरात भारतातील पहिली एज्युसिटी उभारली जाणार आहे. यासाठी युएसए (USA), युके (UK), इटली आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील सहा नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत.
या नामांकित विद्यापीठांचे अभ्यासक्रम याच वर्षापासून (२०२६) सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात न जाता महाराष्ट्रातच जागतिक दर्जाची पदवी घेता येईल.
मुख्यमंत्री विज्ञान वारी
- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री विज्ञान वारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ बक्षिसेच मिळणार नाहीत, तर त्यांना जगातील सर्वोत्तम अंतराळ संस्थांना भेट देण्याची संधी मिळेल.
- निवडक विद्यार्थ्यांना भारताची ‘इस्रो’ (ISRO) आणि अमेरिकेची ‘नासा’ (NASA) या संस्थांमध्ये अभ्यासासाठी पाठवले जाईल. यासाठी बक्षीस रक्कमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.
रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भर
- केवळ पदवी देणे हा उद्देश नसून, किमान ८० टक्के पदवीधारकांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी प्रतिभा केंद्र (Talent Hubs) निर्माण करण्यात येतील.
- अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल: अमरावती विभागातील सर्व शैक्षणिक कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी हे भव्य संकुल उभारले जाईल. यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल.
- ८ ते १० शैक्षणिक केंद्रे: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी राज्यात ८ ते १० विशेष शैक्षणिक केंद्रांची उभारणी केली जाणार आहे.
मूलभूत साक्षरतेवर लक्ष
राज्यात १०० टक्के मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
