कुठे दोन किलो मीटर रांगाच रांगा, तर कुठे माऱ्यामाऱ्या; महाराष्ट्रावरचं पेट्रोलचं मोठं संकट संपेना
महाराष्ट्रामध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG ची तीव्र टंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनासाठी २ किमी लांब रांगा लागल्या असून, जालना व कोल्हापुरात पंपांवर मारामारी आणि दरवाढीमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प होत आहे. ठाणे प्रशासनाने बाटलीत इंधन विक्रीवर बंदी घातली आहे. हे गंभीर इंधन संकट कधी संपेल याची चिंता नागरिकांना आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू झालेलं पेट्रोलचं संकट काही संपता संपण्याचं नाव घेत नाही. राज्यातील पेट्रोल पंपांवर आजही भली मोठी रांगा दिसली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यावरून पेट्रोलचं संकट किती मोठं आहे याची कल्पना येते. काही ठिकाणी तर थेट माऱ्यामाऱ्या होतानाही दिसत आहे. जालन्यातील पेट्रोल पंपावर एका टोळक्याने थेट पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पेट्रोल दिलं नाही म्हणून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रस्त्यावरील नक्षत्रवाडी पंपावर ऑटो चालकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटे 5 वाजल्यापासूनच ऑटो रिक्षा चालक पंपावर गॅसच्या प्रतीक्षेत रांगेत उभे आहेत. एका दिवसात गॅसचे दर 10 रुपाने वाढल्याने आता ऑटो एलपीजी गॅस 100 रुपये प्रति लिटरवर गेला आहे. 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढले आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून ऑटो रिक्षा चालक पंपा समोर रांगेत उभे आहेत. तर काही रिक्षा चालक पंपावरच मुक्कामी आहेत. ऑटो एलपीजी गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत आले आहेत.
जालन्यात पेट्रोल पंपावरच मारहाण
जास्तीचे डिझेल न दिल्यामुळे एका पेट्रोल पंप चालकास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप चालकास 3 ते 4 व्यक्तींनी 1000 लिटर डिझेलची मागणी केली. सध्याची टंचाई पाहता पेट्रोल पंप चालकाने यास नकार दिल्यामुळे या पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण करण्यात आली. राहुल उगले असे पेट्रोल पंप चालकाचे नाव असून याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी या पेट्रोल पंप चालकाने केली आहे. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अदाखल पत्र गुन्हा दाखल केला आहे.
30 टक्के रिक्षा बंद
कोल्हापुरात एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी 45 रुपये किलो असलेला गॅसचा दर 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. वाढलेल्या एलपीजी गॅसच्या किमतीमुळे कोल्हापूर शहरातील 30 टक्के रिक्षा व्यवसाय बंद झाला आहे. पुढच्या दोन दिवसात शहरातील रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याची चिन्हे आहेत. एलपीजी गॅसचे दर कमी करा अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी दिला आहे.
बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी
समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीने मनाई केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही, असा आदेशच पांचाळ यांनी काढला आहे.
