Ladki Bahin : 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणं म्हणजे… जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; ट्विटची होतेय चर्चा
लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांना अपात्र ठरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करत आर्थिक संकटाकडे लक्ष वेधले आहे. जयंत पाटील यांनी 'गरज सरो आणि वैद्य मरो' म्हणत, लोकसभा निवडणुकीसाठी वापरून आता महिलांना वगळल्याचा आरोप करत योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी आतापर्यंत 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. ईकेवयासी योजनेनंतर लाखो महिलांना योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्याने आता केवळ 1 कोटी 66 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र यावरून आताविरोधकांनी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं असून लाखो लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. आधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी लाजकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
X या सोशल मीडिया अकाऊंटवरून जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
काय आहे जयंत पाटील यांचं ट्विट ?
लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे असं जयंत पाटील म्हणाले.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनीम्हटलं.
शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.
लाखो महिलांना ठरल्या अपात्र
गोरगरिब आणि वंचित कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ व्हावं आणि या महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. ज्या ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला, सुरूवातीला सरकारने त्या सर्वांना आर्थिक लाभ दिला. कोट्यवधी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. मात्र लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार होत असल्याचे दिसत असल्यावर पडताळणी करण्यात आली. नंतर योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी इकेवायसी बंधनकारक करण्यात आली. अनेक महिला अपात्र ठरल्याने आता लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला महिला लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. आता छाननी केल्यानंतर महिला लाभार्थ्यांची संख्या 1.66 कोटी इतकी झाली आहे
