राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट, या ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता
जानेवारी महिन्याच्या शेवटीच्या काही दिवसांमध्ये राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल होत असून येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Weather News : राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात दररोज बदल होताना दिसत आहेत. अशातच हिवाळ्याचा शेवट जवळ येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. थंडीचा कडाका हळूहळू कमी होत असून, अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या वेळेत काही ठिकाणी धुके जाणवत आहे तर दुपारनंतर उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर 27 जानेवारी 2026 रोजी राज्यातील हवामान कसे राहणार आहे याचा आपण आढावा घेणार आहोत.
मुंबईत आज कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा प्रभाव कमी झाल्यामुळे रात्रीचा गारवा कमी जाणवेल तर दिवसा उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात तापमानात फारसा बदल होणार नसून, समुद्रकिनारी मध्यम वेगाने वारे वाहतील.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज सकाळच्या वेळेत हलके धुके जाणवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता अत्यल्प आहे. मात्र, काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलक्या सरी पडू शकतात.
पश्चिम महाराष्ट्रात कोरडे हवामान
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि परिसरात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. तर पुण्यात आज कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात हळूहळू वाढ होत राहील आणि थंडीचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात ढगाळ वातावरण
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत आज सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज ढगाळ वातावरण राहणार आहे.
ठाणे, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
राज्यातील विविध भागांत हवामानात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे बळीराजा अडचणीत सापडला असून, रब्बी हंगामातील पिकांचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
