महायुतीतला संघर्ष पुन्हा उघड, फडणवीस-शिंदे शेजारीच उभे, पण एकही शब्द… नेमकं काय घडतंय?
महायुतीमध्ये सध्या सुप्त संघर्ष असल्याचे बोलले जात आहे. याचीच एक झलक हुतात्मा चौकातील एका कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

Eknath Shinde Devendra Fadnavis Clash : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षातून भाजपात होत असलेल्या जोरदार इन्कमिंगमुळे शिवसेना पक्षात खदखद आहे. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच थेट दिल्लीलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडेही करण्यात आली आहे. त्यानंतर एकमेकांचे नते आणि पादाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे महायुतीत ठरलेले आहे. परंतु महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेतील बेदीली अद्याप मिटलेली नाही, असे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांत एकमेकांबद्दल नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच याची झलक दिसली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकाच कार्यक्रमात असूनही एकमेकांशी बोलले नाहीत, असे बोलले दिसून आले आहे.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेतील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर महायुतीत वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र यांची तक्रार केल्याचेही सांगण्यात येत आहे. आता महायुतीतील वाद संपलेला आहे, असे सांगितले जात आहे. परंतु हा वाद अजूनही मिटलेला नाही. शिंदे यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर शुक्रवारी (21 नोव्हेंबर) मुंबईतील हुतात्मा चौकात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. परंतु यावेळी त्यांची देहबोली मात्र काहीशी वेगळी दिसल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जातेय. शिंदे आणि फडणवीस यांची देहबोली बदललेली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते.
कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
हुतात्मा चौकातील कार्यक्रमात सुरूवातील देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. अभिवादनानंतर शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठ करून उभे राहिले. दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचे बोलले जात आहे. याच प्रसंगाचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामुळेच महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
