अजित दादा, शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट करताय, इतकं क्रूर सरकार… मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली असून, विदर्भ-मराठवाड्याची उपेक्षा आणि महायुती सरकारच्या धोरणांवरून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र होणार आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाची मोठी घोषणा केली आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. आम्ही सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी सरकारमधील काही घटकांकडून सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावरही गंभीर आरोप केले.
अजितदादा आणि शिंदे गटाचे मंत्री टार्गेट
मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत महायुती सरकारमधील अंतर्गत कारभारावर बोट ठेवत खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले, “माझा प्रश्न आहे की अजितदादा आणि शिंदे गटाचे मंत्री टार्गेट का होतात? कारण ते गरीबांची समस्या जाणून घ्यायला मैदानात येतात. जे गरीबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी ते सोडवू नयेत म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. या लोकांना लावालावी करण्यापलीकडे काहीही येत नाही आणि यांच्यात गरीबांचे प्रश्न सोडवण्याची क्षमताही नाही, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
तुम्हाला स्वतःला तर बाहेर यायचं नाही. तुम्ही फक्त टाळ्या वाजवणाऱ्यासारखे बंगल्याच्या आत बसून राहता. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची तुमची दानत नाही. सध्या डिझेलचा इतका उद्रेक सुरू आहे, पण तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही की लोकांचे काय हाल चाललेत. त्यात एखादा माणूस जळाला, तरी त्याला दवाखान्यात जाऊन बघण्याची सौजन्यशीलता दाखवली जात नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अवस्था तर वाईट आहे. एखादा माणूस गंभीर आजारी असेल तर निधी मिळायला ८ दिवस लागतात; तोपर्यंत एकतर पेशंट मरतो नाहीतर घरी येतो. इतके क्रूर सरकार देशात किंवा जगात कधीही आले नसेल,” असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठ्यांकडे कोणताही मंत्री येऊ नये म्हणून कारस्थान
देवेंद्र फडणवीस १०० टक्के मराठ्यांना आरक्षण देतात, पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्या मंत्र्यांनाच भेटायचं का? जे प्रश्न सोडवतात, त्यांनाच टार्गेट का करता? फक्त मराठ्यांकडे कोणताही मंत्री यायला नाही पाहिजे. त्याला नुसतं टार्गेट करा, या तुमच्या भूमिका आणि ही तुमची नितीमत्ता, खरं बोला रे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांकडे कोणताही मंत्री येऊ नये म्हणून कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, कारण ते सधन आहेत, त्यांच्याकडे ऊस, फळबागा आणि द्राक्षं येतात, असा युक्तिवाद केला जातो. मग माझा सवाल आहे की, ओबीसींकडे हे सर्व नाही का? तिथे असलेल्या ओबीसी बागायती लोकांना आरक्षण नाही का? हा आरक्षणाचा कोणता नियम आहे? तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्या पोरांना आरक्षणातून नोकऱ्या मिळाल्या नाहीत का? असा सवालही मनोज जरांगेंनी केला
आमरण उपोषणाला बसणार
तुम्हाला जर आमच्याशी खेटायचं असेल, तर येत्या ३० तारखेपासून थेट खेटू! २९ मे रोजी आमच्या मागण्यांना १० महिने पूर्ण होत आहेत. यामुळे ३० मे पासून आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आगामी काळात मराठा आरक्षणाचा लढा अधिक उग्र होण्याची चिन्हे आहेत.
