Manoj Jarange Patil : फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे हे..मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
Manoj Jarange Patil : "राजकीय स्वार्थासाठी एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून होत आहे. शिंदेंच्या इथे मराठ्यांचे विरोधक कसे काय जातात? हा सर्वांचा ठरवून प्लान आहे"

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आज त्यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. आरोपांची राळ उडवून दिली. पुन्हा मुंबईत यावं लागेल असंही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भरपूर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भरपूर तोंडसुख घेतलं. “मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती.किती दिवस डबल ढोलकी वाजवणार. मी मिंधा नाही,जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले. ‘बावनकुळे हा फडणवीस यांचा मालक झाला का?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
“एकनाथ शिंदे यांच्या नेत्याच्या कॉलेज मध्ये बैठका घेता. फडणवीस यांनी चांगल्या, चांगल्याच्या झाक उतरवल्या. परंतू मी त्यांची झाक उतरवली. फडणवीस साहेब तुम्ही राजकारणातून संपेल म्हणून खूप मेटाकुटीला आले होते. तुमचं सगळं काढीन. बावनकुळे यांनी प्रमाण पत्र रद्द करायला लावले. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आता वेळ पडली तर मुंबईला जावं लागणार आहे” असही जरांगे पाटील बोलले. “एकट्या बावनकुळेसाठी फडणवीस तुमचं संपूर्ण नेटवर्क अडचणीत येईल” असा दावा जरांगेंनी केला.
मला बदनाम करायचं काम सुरू आहे
“फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे आदेश काढूच शकत नाही. हे एकाचं काम नाही. माझा पहिला विश्वास मराठ्यांवर आहे. दुसरा मीडियावर आहे. मला डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला एकटं पाडायचं आहे. माझ्या विरोधात कट आहे. मला बदनाम करायचं काम सुरू आहे. मी काँग्रेसचा नाही, भाजपचा नाही, कुणाचाच नाही. त्यामुळे त्यांना जड जात आहे. त्यामुळे मला बदनाम करून बाजूला सारायचं आहे. मराठ्यांचा माझा विश्वास आहे. हे पोरगंच आरक्षण देऊ शकतो, हे मराठ्यांना माहीत आहे. माझे समर्थक मरमर करत आहेत. पण काही लोक त्यांचेच पाय चाटत आहेत” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
