रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर
Nilesh Rane : गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सरकारला खडा सवाल विचारला आहे. रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.

गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात अनेकदा गोमांसाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही भागात गोमांसाची सर्रासपणे विक्री होत असल्याचेही समोर आलेले आहे. यावर आता आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवत गायींचा जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न सरकारला विचारला आहे. निलेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
गोहत्येवरून निलेश राणेंचा सरकारला घरचा आहेर
निलेश राणे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात गो हत्या थांबली आहे का, हे तपासा. आपण गाईला वाचवू शकत नाहीये. दुसऱ्यांदा या गुन्ह्यात सापडल्यावर मोक्का लावणार म्हणून सांगितले होते. मात्र गोहत्येच्या केसमध्ये सापडलेल्या एकाला तरी मोक्का लावलेले नाव जाहीर करा. रोहित शेट्टीच्या बिल्डिंग वर गोळी मारली तर रस्ता जॅम होईल इतका बंदोबस्त लावला जातो. रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का?’ असा खडा सवाल निलेश राणे यांनी सरकारला विचारला आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
गोहत्या रोखण्यासाठी अनेक हुंदुत्ववादी संघटना पुढाकार घेत आहेत. अनेकदा कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींना पकडून त्यांना गोशाळेत पाठवले जात आहे. गोहत्या थांबवण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. मात्र अद्यापही या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळेच निलेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते आणि यापुढे या गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काजू उत्पादक शेतकऱ्यांवरही भाष्य
पुढे बोलताना निलेश राणे यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. राणे म्हणाले की, काजू उत्पादकांना एमएसपी मिळत नाही. हे होणार का? गोव्या राज्याने हे केलं आहे. काजूची लागवड खराब झाली, शेतकरी बरबाद झाला. आपल्या काजूमध्ये आफ्रिकन काजू मिक्स होतो. काजू उत्पादकांना सरकारने संरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी राणे यांनी केली आहे.
