Monsoon Forecast 2026 : यंदा महाराष्ट्रावर पावसाचं सर्वात मोठं संकट, आयएमडीच्या अंदाजाने धाबे दणाणले, सरकारची तातडीची बैठक
यंदा राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते, अखेर आता आयएमडीकडून पावसाबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला आहे. अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. तर त्यातच काही ठिकाणी पुढील 48 तासंमध्ये पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पावसानं हजेरी देखील लावली आहे. दरम्यान आता एप्रिल संपत आला आहे, लवकरच मे महिन्याला सुरुवात होईल, आणि जूनमध्ये मान्सून देशासह राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशासह राज्याचं अर्थकरण बहुतांश प्रमाणात मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतं.
दरम्यान यंदा राज्यात मान्सून कसा असणार? याबाबत हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वीच पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे देशासह राज्याची चिंता वाढली आहे. कारण यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरामध्ये अल निनोसाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे, याचाच परिणाम म्हणून राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजनुसार जर यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहिला तर राज्यात सरसरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला होता, तर यावर्षी पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं संकट असणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीला हवामान विभाग, कृषी मदत आणि पुनर्वसन विभाग, वित्त विभाग, जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यंदा पावसावर अल निनोचं सावट आहे. याचा सर्वात जास्त फटका हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बसू शकतो. यंदाच्या पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता कमी असेल, पण उष्णतेच्या लाटा अधिक असतील. मात्र यामध्ये जर पॉझिटिव्ह IOD विकसित झाल्यास परिणामांची तीव्रता कमी असे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 2015 मध्ये पाऊस येऊन गेल्यावर 45 टक्के पाणीसाठा होता, मात्र तो आज आपल्याकडे पाऊस यायच्या आधीच आहे. त्यामुळे परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करा, त्यासाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामे प्राधान्याने करा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
2015 नंतर बरेच काही आपण शिकलो आहोत. कमी पावसात सुद्धा सिंचन देणारे हेच साधने आहेत. पाऊस कमी असल्याने पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा आतापासून विचार करावा लागेल. चारा टंचाई होणार नाही, याची काळजी घ्या. कारण इतर राज्यातही तशीच परिस्थिती असेल. पाणी वाचवण्यासाठी आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार कराव्या, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
