भाजपकडून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम; तब्बल 9 शिलेदारांना दाखवला घरचा रस्ता, कुठे, कुणी केला गेम?
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) किमान १० उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. अंधेरी, कुर्ला आणि वांद्रे यांसारख्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये बंडखोरीचा फटका कसा बसला, याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या विजयरथाला भाजपच्या बंडखोरांनी अनेक ठिकाणी खीळ घातल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईतील किमान १० प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. या निकालांमुळे आता युतीमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच शिवसेनेच्या अंतर्गत गोटात संतापाची लाट आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुंबईतील विविध उपनगरांमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष किंवा इतर पक्षांकडून शड्डू ठोकला होता. याचे विदारक परिणाम निकालातून स्पष्ट झाले आहेत. जागावाटपात शिवसेनेने जास्त जागा लाटल्या, असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होत असतानाच, निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीने एक खळबळजनक वास्तव समोर आणले आहे. भाजपच्या १० हून अधिक बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. जर ही बंडखोरी रोखण्यात भाजप नेत्यांना यश आले असते, तर आज शिवसेनेच्या नगरसेवकांचा आकडा १० ने वाढलेला दिसला असता, असे बोललं जात आहे.
कुठे, कोणामुळे आणि किती मतांनी झाला गेम?
- अंधेरी इस्ट (प्रभाग १२१): शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा पराभव मुंबईतील सर्वात चर्चेचा ठरला. त्यांना केवळ १४ मतांनी पराभवाचा धक्का बसला. या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी करत १७५ मते मिळवली. ही १७५ मते युतीला मिळाली असती, तर निकाल पूर्णपणे वेगळा असता.
- कुर्ला (प्रभाग १६९): आमदार मंगेश कुडाळकर यांचे सुपुत्र जय कुडाळकर यांना ९७० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे बंडखोर अमित शेलार यांनी तब्बल ३२२५ मते घेतल्याने शिवसेनेच्या हक्काची मते विभागली गेली.
- वांद्रे पूर्व (प्रभाग ९४): या प्रभागात शिवसेनेच्या पल्लवी सरमळकर यांचा २३६० मतांनी पराभव झाला. मात्र, याच प्रभागात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेश्मा मालुसरे यांनी बंडखोरी करत ६८३२ मते मिळवली. मालुसरे यांच्याकडे वळलेली ही मोठी मतपेढी पूर्णपणे भाजपची हक्काची मते होती, जी शिवसेनेला न मिळाल्याने सरमळकर यांना पराभव स्वीकारावा लागला.
- सायन कोळीवाडा (प्रभाग १७३): भाजपच्या मंडल अध्यक्षांची मोठी झेप शिवसेनेच्या पूजा कांबळे यांना ४९७४ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. येथे भाजपच्या मंडल अध्यक्ष शिल्पा केळुसकर यांनी बंडखोरी करत तब्बल ९३१० मते घेतली. केळुसकर यांनी घेतलेली मते ही शिवसेनेच्या पराभवाच्या फरकापेक्षा दुप्पट आहेत.
- दिंडोशी (प्रभाग ४१): शिवसेनेच्या मानसी पाटील ५९६ मतांनी पडल्या; भाजपचे बंडखोर दिव्येश यादव यांनी १२६० मते घेतली.
- अणूशक्ती नगर (प्रभाग १४३): शोभा जयभाये यांचा ९४३ मतांनी पराभव; भाजप तालुका अध्यक्ष स्वाती उम्रटकर यांची बंडखोरी नडली.
- वर्सोवा (प्रभाग ६१): राजूल पटेल यांचा २००५ मतांनी धक्कादायक पराभव; भाजप मंडल अध्यक्ष उर्मिला गुप्ता यांनी २७३७ मते मिळवून समीकरण बिघडवले.
- मागाठाणे (प्रभाग १२): सुवर्णा गवस यांचा २८८४ मतांनी पराभव; भाजपच्या बंडखोर प्रिती दांडेकर यांनी २७४५ मते घेतली.
- दिंडोशी (प्रभाग ३९) : या ठिकाणी विनया सावंत यांचा २३५२ मतांनी पराभव झाला. येथे भाजपच्या मंडल अध्यक्षांच्या पत्नी सुमन सिंग यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.
युतीधर्मापेक्षा बंडखोरीला प्राधान्य
दरम्यान यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने दुसऱ्या पक्षाला मदत केल्याचा आरोप शिवसेनेच्या गोटातून होत आहे. जागावाटपात शिवसेनेने मुंबईत ३० हून अधिक प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुकांवर मात करून जागा मिळवल्या होत्या. मात्र, तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्मापेक्षा बंडखोरीला प्राधान्य दिल्याचे दिसते. जागा घेतल्या पण मते का फिरली नाहीत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
