मुंबई: राज्यातील कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC exam) मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी आता पालक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पालक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी हस्तक्षेप करुन महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार का, हे पाहावे लागेल. ( SSC and HSC exam in Maharashtra)
इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशनने पंतप्रधान मोदींना हे पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलच्या अखेरीस सुरु होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. या परीक्षा रद्द झाल्या नाही तर किमान ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले होते.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती.या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते. राज्यात शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शनिवारच्या पेपरच काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
संबंधित बातम्या :
Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?
पुण्यात मिनी लॉकडाऊन, दहावी-बारावी, MPSC परीक्षांचं काय?
( SSC and HSC exam in Maharashtra)