मुंबईत मराठी भाषेचा अपमान, प्रसिद्ध कॉलेजमध्ये संतापजनक प्रकार, नेमकं काय घडलं?
कांदिवलीतील बालभारती महाविद्यालयाच्या गुजराती नामफलकावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी भाषा दिनापूर्वी कायमस्वरूपी मराठी फलक लावण्याचा इशारा संतोष राणे यांनी दिला असून मनसेच्या आंदोलनाचा इतिहासही चर्चेत आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात बहुसंख्य लोक हे मराठी भाषिक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. एकीकडे राज्यात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. तर दुसरीकडे मुंबईतील एका कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात असलेल्या बालभारती मगनलाल जे. पांचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजचे नाव मुख्य प्रवेशद्वारावर मराठीऐवजी गुजरातीत लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
मुंबईतीली कांदिवली परिसरात असलेल्या बालभारती या कॉलेजच्या नामफलकावरून सध्या मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. या महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठीऐवजी गुजराती भाषेतून फलक लावण्यात आला आहे. या कॉलेजबाहेर गुजरातीत फलक लावल्याने स्थानिक मराठी भाषकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
नियम काय?
महाराष्ट्र राज्याच्या नियमांनुसार, सर्व दुकाने, आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागावरील नामफलक हे मराठी (देवनागरी लिपी) भाषेत असावे, असा नियम आहे. इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठी भाषेतील नाव हे मोठ्या किंवा समान आकारात असणे अनिवार्य आहे. मात्र कांदिवलीच्या या महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी प्रवेशद्वारावर फक्त गुजराती भाषेतील फलक लावल्याचा आरोप होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याच मुद्द्यांवरुन महाविद्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती. त्यावेळी झालेल्या वादानंतर महाविद्यालय प्रशासनाने मूळ गुजराती फलकावर मराठी नावाचा एक स्टिकर चिकटवला होता. पण काही दिवसांतच तो स्टिकर निघून गेला. त्यानंतर आता पुन्हा केवळ गुजराती भाषेतील नाव झळकू लागले आहे. या प्रकारामुळे महाविद्यालय प्रशासनाची नियमाबाबतची उदासीनता स्पष्ट होत आहे, अशी टीका होत आहे.
ठाकरे गट आक्रमक
याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख संतोष राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगार व सेवा अटी) अधिनियम, २०१७’ नुसार मराठी नामफलक लावणे बंधनकारक आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांना माहिती समजण्यासाठी मराठी फलक असणे गरजेचे आहे. उद्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. यापूर्वी महाविद्यालयाने कायमस्वरूपी आणि ठळक मराठी नामफलक लावावा, अन्यथा शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर देतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेनंतर आता स्थानिकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने स्पष्ट निर्देश देऊनही जर महाविद्यालय प्रशासन नियम पाळत नसेल, तर त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. आता यावर कॉलेज काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
