लाडकी बहीण लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर, फसवणूक होण्याचा धोका
लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलेचे नाव बँकेचा आयएफसी कोड आणि मोबाईल नंबर असल्याने या महिलांची ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी असलेल्या महिलांची वैयक्तीक माहिती समाज माध्यमांवर आली आहे. पालघरमधील 11,172 लाडक्या बहिणींची वैयक्तिक माहिती समाज माध्यमांवर आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे या लाडक्या बहिणींची येत्या काळात ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही त्रुटी असलेल्या महिलांची वैयक्तिक माहिती संबंधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवली आहे. ही यादी समाज माध्यमांवर देखील अनेक ठिकाणी आली आहे.
ही माहिती समाज माध्यमांवर
लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलेचे नाव बँकेचा आयएफसी कोड आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर आल्याने या महिलांची ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून महिलांना कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला तर आपली वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये, असा आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.
पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये गर्दी
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. मात्र बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. बँकेच्या बाहेर लाभार्थी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. त्यामुळे बँकेचे इतर कामे ठप्प झालेली पाहायला मिळते.




बीडमधील परळीतील एसबीआय बँकेत केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई – केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी 15 ऑगस्ट नंतर बँकांबाहेर महिलांची रांगा दिसून येते आहे. 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर अनेक वंचित असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस बँक सेतू सुविधा केंद्र येथे गर्दी करत आहेत. धाराशिव-उमरगा शहरातील बँकेच्या मुख्य शाखेत आज सकाळपासून इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेक योजनेचे लाभार्थीना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सध्या लाडक्या बहीण योजनेचे केवायसी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला येत असून कनेक्टिव्हिटी नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होताना दिसत आहे.