AIMIM: राज्यात डावात मचाळा! महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एमआयएमशी घरोबा; स्वार्थासाठी दूर राजकीय अस्पृश्यता
AIMIM in State Politics: राज्यातील राजकारणात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमची दमदार एंट्रीची देशभरात चर्चा सुरू आहे. बिहारमधील सीमांचलपासून ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेपर्यंत एमआयएमचा डंका वाजला आहे. त्यामुळे अनेकांना हा एकांगी पक्ष अचानक जवळचा वाटू लागला आहे.

AIMIM in State Politics: राज्यातील राजकारणात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने अनेकांना धोबीपछाड दिला. भाजपची बी टीम ते डार्क हार्स असा एमआयएमचा प्रवास अनेकांना आश्चर्याचा धक्का आहे. काँग्रेसची पोकळी भरून काढण्याची आणि मुस्लिमांना पुचकारण्यात एमआयएम यशस्वी ठरलं आहे. बिहारमधील सीमांचल पट्ट्यातील विधानसभा निवडणुकीपासून ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेपर्यंत एमआयएमने दमदार एंट्री घेतली आहे. या पक्षाची एंट्री ही अनेकांसाठी कसाईनुमा ठरली आहे. तर धर्मनिरपेक्ष विचारांना मोठा धक्का मानल्या जात आहे. एकीकडे भाजप हा हिंदुत्वाचा प्रखर समर्थक मानल्या जात असताना एमआयएम मुस्लिम बेल्टमध्ये असाच रहनुमा होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे एमआयएम सारखा वैचारिक विरोधक असतानाही त्याच्याशी दिलजमाई करण्याची कोण घाई भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितला झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी एमआयएमची राजकीय अस्पृश्यता गळून पडल्याचे दिसून येते.
एमआयएमचा राजकीय कॅनव्हॉसवरील वावर व्यापक
2014 मधील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मध्य(औरंगाबाद मध्य) आणि भायखाळा या दोन जागा खिशात घातल्यानंतर एमआयएमने राज्यातील मुस्लिमबहुल पट्ट्यात दाट जाळं विणण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड महापालिकेत एमआयएमने मुसंडी मारली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एमआयएमच्या एंट्रीने जनमानस हादरले. पण काँग्रेसला काडीचाही फरक पडला नाही. पुढे 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्य आणि भायखाळ्यात एमआयएमचा दारूण पराभव झाला. पण या पक्षाने धुळे आणि मालेगाव मध्य हे नवीन गड तयार केले.
त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या रुपाने एक खासदार पक्षाने कमावला. ही पक्षासाठी मोठं यश होते. पण हिंदू आणि मुस्लिम समाजातील धर्मनिरपेक्ष विचारांना हा मोठा फटका होता. एकीकडे हिंदूत्व विचार आणि दुसरीकडे कट्टर मुस्लिम धार्जिणी विचारसरणीत समाज विभागात जात असल्याचे चित्र आहे. हा प्रयोग दोन्ही समाजातील अस्थिरता, साशंकता आणि भीतीला खतपाणीच घालत असल्याचे दिसते. आता एमआयएममध्ये असे चेहरे पण दिसत आहेत ,जे पूर्वी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणात आघाडीवर होते.
पुढारलेले तरूण एमआयएममध्ये
पुढारलेले तरुण एमआयएमच्या जाळ्यात येत असल्याचे गेल्या काही वर्षातील चित्र आहे. या पक्षाकडे सामान्य गोरगरिब, हातावरचे पोट असलेला मुस्लिम समाजच नाही तर मुस्लिमातील स्कॉलर म्हणून ओळखला जाणारा मोठा वर्गही दाखल होत आहे. डॉक्टर, वकील, शिक्षक, वैज्ञानिक, इतिहासतज्ज्ञांसह इतर अनेक तज्ज्ञ या पक्षाच्या ताफ्यात सहभागी होत आहे. भाजपच्या प्रखऱ हिंदूत्वाविरोधात मुस्लिम कार्ड चालते याचे पक्के अंकगणित एमआयएमने गिरवले आहे. अगोदर वंचितशी हातमिळवणी करत अनुसूचित जातीलाही जवळ करण्याचा प्रयत्न एमआयएमने केला. सेक्युलरपणाचा हा आव मात्र एमआयएमला टिकवता आला नाही. त्यानंतर एमआयएमने मुस्लिम पट्ट्यात आता मोठा प्रयोग करुन दाखवला आहे.
125 जागांवर एमआयएमची मुसंडी
एमआयएमने महापालिका निवडणुकीत राज्यात 125 जागांची घसघशीत कमाई केली. कधी काळी एक ठिपकाही नसलेल्या या पक्षाने महाराष्ट्राच्या नकाशात आता ठसठशीत छबी उमटवली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 33 जागांची कमाई एमआयएमने केली आहे. गेल्यावेळी हा पक्ष 25 जागांवर होता. तर त्यापूर्वी मुस्लिमांनी या पक्षाला थारा दिलेला नव्हता. मालेगावमध्ये मात्र एमआयएमला माजी आमदार शेख यांनी अस्मान दाखवले. इस्लाम पक्षाच्या मदतीने त्यांनी या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. पण अमरावती, मुंबईसह इतर अनेक ठिकाणी एमआयएमने झेंडा रोवला आहे. मुंब्र्यातील पुरोगामी विचारांचीच नाही तर समाजवादी पक्षाची, काँग्रेस, राष्ट्रवादीची पिछेहाट ही चिंतनीय नक्कीच आहे.
मग डावात मचाळा सुरू
आता राज्याच्या राजकारणात अकोला जिल्ह्यातील अकोट आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील भाजपसोबत एमआयएमच्या युतीच्या चर्चेने खळबळ उडवून दिली आहे. अर्थात दोन्ही पक्ष अशी युती झाली नसल्याचा दावा करत आहे. पण स्थानिक पातळीवरील घडामोडी काही लपून राहिल्या नाहीत. तर काही ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महानगरपालिकेत अकोला पॅटर्न राबविल्या जात आहे. त्यात काँग्रेस, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम असं समीकरण जुळण्याची चिन्हं आहेत. कुठं काँग्रेस-शिंदे सेना एकत्र आली आहे. काही ठिकाणी एमआयएम शहर विकास आघाडीचा भाग आहे. तर दुसरीकडं ती एखाद्या स्थानिक पातळीवरील राजकीय घाडमोडीचा की फॅक्टर आहे. म्हणजे एमआयएम राजकारणात अस्पृश्य नाही. तर एमआयएमशिवाय इतर पक्षांचं गणित पुढं सरकत नसल्याचे दिसत आहे. पण एमआयएम जर कट्टर, एकांगी धार्मिक विचारसरणीचा पक्ष असेल तर मग त्याच्याशी फटकून वागण्याचे धोरण प्रस्थापित पक्ष का घेत नाही हा प्रश्न मतदारचं सोडवू शकतील.
