VIDEO: यशवंत जाधव भीमपुत्र, कुणालाही घाबरणार नाहीत: महापौर किशोरी पेडणेकर
स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
मुंबई: स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितलं. आयटीचे (income tax raid ) अधिकारी काही माहिती घेण्यासाठी आले आहेत. ही पाहणी आहे. त्याचा एवढा का बाऊ केला जात आहे? धाड पडली धाड पडली असं का सांगितलं जात आहे? आयटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिली असेल तर ते त्याची माहिती देतील. त्याचा बाऊ करण्याची गरज काय?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मी भराडी देवीच्या जत्रेला गेले होते. आता आले. आम्ही कशाला लपून राहू? असा सवालही त्यांनी केला.
यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले. सकाळपासून आयटी विभागाचे अधिकारी जाधव यांच्या निवासस्थानी ठाण मांडून आहेत. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. महापौर किशोरी पेडणेकरही जाधव यांच्या घराजवळ आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अशा धाडी काही पहिल्यांदाच पडत नाहीत. अनेकांवर धाडी पडल्या आहेत. आयटी फॉर्म भरताना काही कमी राहिलं असेल. त्याचा तपास करण्यासाठी अधिकारी आले असतील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
त्यांना आसुरी आनंद होतोय
ही सर्व प्राधिकरणं कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी आहेत. त्यांना जी माहिती हवी आहे. ती माहिती यशवंत जाधव देतील. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. असा त्रास होत आहे म्हणून घाबरणार नाही. अशा धाडीमुळे काही लोकांना आसुरी आनंद होत आहे. विकट किचकट भाषण करत आहेत. हे सर्व तेवढे दूध के धुले आणि फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरबटलेले लोक पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसैनिक अनुचित वागू नये म्हणून
यावेळी त्यांनी जाधव यांच्या घराजवळ येण्याचं कारणही सांगितलं. शिवसेना ही एक कुटुंब आहे. अशी काही घटना होते तेव्हा शिवसैनिक चुकीचा वागू शकतो. त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी आणि शांत करण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे. पोलीस आणि यंत्रणेला मदत केली पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
किरीट भावा, ते गाळे परत दे
सोमय्या यांनी महापौरांनी गाळे लाटल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत विचारले असता किरीट भावा, माझे आठ गाळे कुठे आहेत हे मला परत आणून दे, असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच मुंबई आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?
यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?