Pre-Monsoon Alert: काळ्या ढगांच्या गप्पा…सोसाट्याचा वारा…पुढील चार दिवसांत राज्यातील या जिल्ह्यात पावसाच्या धारा?
Pre-Monsoon Alert: महाराष्ट्रात उकाड्याने आणि उष्णतेच्या लाटेने जनता हैराण झाली आहे. त्यांच्यासाठी हवामान विभागाने आनंदाचा सांगावा धाडला आहे. राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस सक्रिय होत आहे. काय आहे ती मोठी अपडेट? मुंबईत पाऊस पडणार का?

Maharashtra Weather Update: अनेकांचे अंदाज चुकवत आणि अलनिनोला चकवा देत महाराष्ट्रात पावसाची वर्दी लागणार आहे. प्री-मान्सून वारे तेजीत आले आहे. मान्सूनपूर्व पावसाची लगबग वाढली आहे. आकाशात काळ्या ढगांची गट्टी जमली आहे. तर येत्या 3-4 दिवसात राज्यातील अनेक भागात दमदार आणि मध्यम सरीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण मुंबईकरांना या पावसाची जादू अनुभवता येणार नाही. त्यांना दमटपणा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईत पाऊस पडणार नाही.
या जिल्ह्यात प्री-मान्सून पाऊस
भारतीय हवामान विभागाने (IMD) ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यासह राज्यातील इतर काही भागात 8 मे रोजी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहणार आहे. तर काही भागात यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथील डोंगराळ भागात आणि दऱ्याखोऱ्यात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागात दमदार पाऊस पडेल. आज आणि उद्या 8 मे रोजी पाऊस पडेल. तर काही भागात जोरदार, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पावसाच्या या धबाकुटीमुळे अन निनो आणि सुपर निनोची पाठ चांगलीच सोलली जाणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मुंबईला पावसाच्या का वाकुल्या?
राज्यातील अनेक भागात पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. पण मुंबई आणि आजूबाजूच्या भागात पावसाचा सांगावा नाही. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येत्या 4 ते 5 दिवसांपर्यंत वातावरण दमट असेल. उकाडा जाणवेल. मुंबईकरांना गेल्या काही दिवसात पावसात चिंब चिंब भिजता येणार नाही. त्यांना अजून एक आठवडा वाट पाहावी लागू शकते. हवामानातील बदल आणि समुद्रावरील वाऱ्यामुळे पावसाला मांडव टाकण्यास उशीर होईल.
