शिंदे गटाचा ‘सुप्रीम’ युक्तिवाद, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, वकिलांची घरे…
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, 'पक्षांतर बंदी कायदा आणि दहाव्या शेड्यूलवर लक्ष केंद्रित करा, जुन्या पक्ष घटनेवर नाही.' ठाकरे गटाची पक्षप्रमुखांची निवड लोकशाही पद्धतीनेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेनुसारच काम केलं आहे. त्यानुसारच आमची कार्यकारिणी नियुक्त झाली आहे. आमच्या पक्षप्रमुखांची नियुक्तीही लोकशाही पद्धतीने झाली आहे. त्यामुळे आता समोरच्यांना जे काही रडगाणं गायचं असेल ते गाऊ द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्तिगत काही बोलत असेल तर आम्ही त्यावर बोलू इच्छित नाही. पण ते जर कायद्यावर बोलत असतील तर आम्ही बोलू, असं सांगतानाच त्यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तो करू द्या. ठिक आहे. त्यावर वकिलांची घरे चालतात, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सर्वोच्च न्यायालयात कालपासून पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. नीरज कौल यांनी कालच्या सुनावणीत शिवसेनेची पक्ष घटना, नियुक्त्या आणि ठाकरेंची एकाधिकारशाही यावर बोट ठेवले होते. शिंदे गटाच्या या युक्तिवादावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2018ला काय झालं हे महत्त्वाचं नाही. पक्षांतर झालं की नाही? हे महत्त्वाचं आहे. पक्षांतर बंदी कायदा आणि दहाव्या शेड्यूलवर ऑर्ग्युमेंट आहे. त्यावर बोला. तुमचं रडगाणं सुरू करू नका, असं संजय राऊत म्हणाले.
धुळीतून शिखरावर नेलं
मातोश्रीने तुम्हाला धुळीतून शिखरावर नेलं. तुम्ही काहीच नव्हता. तुमच्या मुलाला खासदार केलं. तुम्हाला मंत्री केलं. तुम्हाला नेता केलं. शिवसेनेच्या त्याच घटनेमुळे तुम्हाला हे सर्व मिळालं. आता तुम्ही त्या घटनेवरच आक्षेप घेत आहात. ठिक आहे. वकिलांची घरे चालतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
पक्षप्रमुखांची निवड लोकशाही पद्धतीनेच
तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही 50 कोटीला आमदार विकत घेता. त्यामुळे उपमुख्यमंत्री काय बोलतात यावर मी काही बोलणार नाही. ते कायद्यावर बोलले असतील तर त्यावर बोलतो. टीएन शेषण यांनी जी आचारसंहिता आखून दिली, त्यानुसार आमच्या कार्यकारिणीने काम केलं आहे. पक्षप्रमुखाची निवडही लोकशाही पद्धतीने झाली आहे. आमच्या सर्व नेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली आहे. जे कोर्टात लोकशाही नाही, असा दावा करत आहेत, त्या शिंदेंची निवडही लोकशाही पद्धतीने झाली आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
मोदींनी आकडे कुठून आणले?
दरम्यान, देशाचा जीडीपी 7.8 वर गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र माजी वित्त सचिवांनी हा आकडा 2.6 एवढा असल्याचं म्हटलं आहे. त्यावरूनही राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. माजी वित्त सचिव गर्ग यांनी जीडीपीचा आकडा 2.6 एवढा असल्याचं सांगितलं आहे. मोदी मात्र विदेशात जाऊन 7.8 एवढा जीडीपी झाल्याचं सांगत आहे. मोदी सांगतात हे खरे असेल तर त्यांनी भारतात येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगावं. पत्रकारांना मिठाई वाटप करावी. देशाला गुड न्यूज द्यावी. पत्रकारांशी चर्चा करावी. आहे का हिंमत तुमच्यात? हे लोक खोटं बोलत आहेत. त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. मोदींनी हे आकडे कुठून आणले? खोटं बोलणाऱ्यांचं ऑपरेशन करावं लागेल, अशी टीका त्यांनी केली.
