Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
Sharad Pawar on Warkari Movement: वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसरल्यावरून वाद झाला होता. वारकरी चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मध्यंतरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. तर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा हाच सूर आळवला आहे.

Sharad Pawar on Anti Elements in Warkari Movement: पाडुंरग, भाळी टिळा, मुखात ग्यान-तुकारामाचा मंत्रघोष, गळ्यात तुळशीची माळ आणि साधी राहणी हा वारकऱ्यांचा नेम आहे. आषाढी, कार्तिकीला लाडक्या विठ्ठलाला डोळेभरून न्याहाळायच्या सुखासाठी वारकरी कित्येक किलोमीटरची पायवरी करत पंढरपूरला येतो. पण या भोळ्याभाबड्या भक्तीसंप्रदायामध्ये कट्टरता पसरवण्याचे काम काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही तुतारी फुंकली आहे. त्यांनी मोठे वक्तव्य तर केलेच पण या प्रतिगाम्यांविरोधात मोठी चळवळ उभारण्याचे संकेतही दिले.
वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मोठे वक्तव्य पवारांनी केले आहे. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेही नाहीत, अशी खंतही पवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वारकरी संप्रदायातील या घुसखोरीविरोधात काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या विधानामुळे येत्या काही दिवसात पडसाद उमटायला सुरूवात होण्याची शक्यता आहे. प्रतिगाम्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायातील या घुसखोरीविरोधात पवार काय भूमिका पुढे जाहीर करतात याकडेही अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन सुरू आहे. या साहित्या संमेलनात सौदामिनी नावाची स्मरणिका तयार करण्यात आली आहे. त्या स्मरणिकेत महिलांचे सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. त्यांनी या लेखात महिलांची प्रबोधनातील टक्केवारी कमी असल्याबाबत चिंता व्यक्त केली.
राज्यात सध्या भोंदूबाबा खरात आणि इतर बुवाबाबांची प्रकरणं समोर येत असताना शरद पवार यांनी केलेले भाष्य चर्चेत आले आहे. सध्या राज्यातील अनेक गावात खरात सारख्या भोंदूमुळे महिलांची आयुष्य उद्धवस्त झाल्याचे समोर येत आहे. आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला भीतीपोटी तक्रार करण्याचेही धाडस दाखवत नसल्याचे समोर आले आहे.
