‘…तर परिस्थिती आणखी बिकट होईल’; वाझेच्या आरोपांनंतर जयंत पाटलांचा नेमका कोणाला इशारा?
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अटकेत असलेल्या सचिन वाझे याने आरोप केले आहेत. या आरोपावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून सचिन वाझेला कोणी प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असं जयंत पाटील म्हणालेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू असलेला पाहायला मिळत आहेत. अशातच आता पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडालीये. देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे आणि त्याचे पुरावे सीबीआयकडे असल्याचं वाझे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना मी एक पत्र लिहिलं असन त्यामधील एका प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नाव असल्याचा आरोप वाझेंनी केला. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांच्या वक्तव्यावर दिले.
निवडणूक आहे त्यामुळे काही लोकांनी साम दाम दंड भेद वापरायचे ठरवलेले दिसतंय. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहितं, कुणाच्या सांगण्यावरून लिहितंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. जनता योग्य उत्तर देईल असं जयंत पाटील म्हणाले. जर कोणी सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर काही लोकांनी परिस्थिती आणखी बिकट होईल. एवढ्या खालच्या पातळीवर जावू नका एवढीच त्यांना सुचना असे म्हणत नाव न घेता जयंत पाटील भाजपला चिमटा काढला.
सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्र व्यवहार सुरू आहे हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक, वाझे यांनी काय लिहिले ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील याचा मला विश्वास आहे. वाझे यांच्या मुलाखतीवर प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले की, दोन वर्षे माणूस शांत असतो अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते हा काही योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खुश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल अशी शंका जयंत पाटील यांनी उपस्थित केली.
