शिवाजी पार्कच्या मुद्द्यावर सेना-मनसे पुन्हा आमनेसामने, उद्धव ठाकरेंच्या निधीतून ‘हा’ प्रकल्प राबवणार
शिवाजी पार्कचे फूटपाथ कायमस्वरुपी उजळलेले कंदील आणि रोषणाईत न्हाऊन निघणार आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती कायमस्वरुपी स्पॉटलाईटच्या दिव्यांचे प्रकाशझोत सोडले जातील
मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या (शिवाजी पार्क) मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना-मनसे आमनेसामने आल्याचं दिसत आहे. शिवाजी पार्कवर दिवाळीत मनसे दरवर्षी विद्युत रोषणाई करत असते, पण आता सेनेकडून या ठिकाणी कायमस्वरुपी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
शिवाजी पार्कचे फूटपाथ कायमस्वरुपी उजळलेले कंदील आणि रोषणाईत न्हाऊन निघणार आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती कायमस्वरुपी स्पॉटलाईटच्या दिव्यांचे प्रकाशझोत सोडले जातील. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, मीनाताई ठाकरे चौक यांचेही सुशोभिकरण होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन स्मारकावरही कायमस्वरुपी रोषणाई केली जाईल. या कामांसाठी मुंबई महापालिकेने अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरुन निविदा मागवल्या आहेत.
मनसेचे इक्बाल चहल यांना पत्र
फेब्रुवारी महिन्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं होतं. शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली होती.
आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर CSR च्या माध्यमातून rain water harvesting प्रकल्प राबवण्याचा राज साहेबांचा मानस pic.twitter.com/s7hyKBe7S9
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 25, 2021
शिवाजी पार्कवर काय बदलणार?
राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसेच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीने शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिवाजी पार्कमैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार करणार केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा